अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहरात महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या तपासणीसाठी प्रशासनाने पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क साधला आहे. वारंवार निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्रयस्थ संस्था म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे तपासणी करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी ‘सीओईपी’ ला दिला आहे.
ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन या कंपनीमार्फत नगर शहरात सर्वत्र एलईडी पथदिवे लावण्यात आले आहेत. महापालिकेशी झालेल्या करारनाम्यानुसार कंपनीकडून दिवे बसविण्यात आल्यानंतर त्याची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याची तरतूद आहे. मात्र, काम सुरू झाल्यापासून वारंवार निविदा प्रसिद्ध करूनही एकाही संस्थेने त्रयस्थ संस्था म्हणून काम करण्यास प्रतिसाद दिला नाही. सद्यस्थितीत कंपनीने शहरात 32 हजार एलईडी पथदिवे बसवल्याचा दावा केला आहे.
या सर्व पथदिव्यांची व एलईडीमुळे वीजबिलात झालेल्या 80 टक्के बचतीची तांत्रिक तपासणी करून त्यानंतरच कंपनीला बिले अदा केली जाणार आहेत. निविदेला संस्थांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका आयुक्तांनी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क साधला आहे. त्रयस्थ संस्था म्हणून प्रकल्पाची तपासणी करण्याचा प्रस्ताव त्यांनी महाविद्यालयाला दिला आहे. महाविद्यालयाकडून अद्याप याबाबत प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच संस्थेची नियुक्ती केली जाईल, असे आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.