नागपूर | वृत्तसंस्था Nagpur
महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग असून अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यासगटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल परिषदेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला.
भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम), नागपूर येथे आयोजित महसूल परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झालेला चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महसूल विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कालानुरूप महसूल विषयक कार्यप्रणालीशी संबंधित धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून तंत्रकौशल्याच्या बळावर हा विभाग अधिक सक्षम व लोकस्नेही करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जात आहे. महसुली सेवा व योजनांच्या लाभांपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासोबतच त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबी सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. या विषयाचा शासनास सादर करण्यात येणारा अहवाल अचूक व निर्दोष असावा, यासाठी प्रत्येक बाबींचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




