धुळे । प्रतिनिधी Dhule
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश मिळविले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
ही गंभीर बाब असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणारे आणि निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक गर्दी असणार्या ठिकाणांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. यादव हे बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा पुनवर्सन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संतोष नवले, ममता हटकर, उपायुक्त गणेश गिरी, डॉ. विशाल पाटील, डॉ. महेश मोरे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. यादव म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच पॉझिटिव्हीटी दरही वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांची चाचणी घेतली पाहिजे. आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच रॅपिड टिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी. त्यासाठी महापालिकेने मुख्य चौकांमध्ये स्टॉल सुरू करावेत.
कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर कार्यान्वित करावेत. सर्वाधिक रुग्ण धुळे शहरात आढळून येत आहेत. ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे, अशा भागात कन्टेन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विवाह सोहळ्यांसाठी 50 व्यक्तींची मर्यादा आहे. तसेच पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. संयुक्त पथकांनी मंगल कार्यालयांना भेटी देत पाहणी करावी. क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ कठेार कारवाई करावी. असे निर्देश त्यांनी दिले.
पोलिस अधीक्षक श्री. पंडित म्हणाले, विना मास्क फिरणार्यांविरुध्द पोलिस दलातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर आयुक्त श्री. शेख यांनी धुळे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.