अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
क्रिकेटच्या किरकोळ वादातून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमधील वाद इतका टोकाला गेला की त्याचा शेवट एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने झाला. आठवीच्या वर्गात शिकणार्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने दहावीच्या वर्गातील 15 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत त्याचा निर्घृण खून केला. शहरातील एका विद्यालयात बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
मुस्तकीन तन्वीर शेख (वय 15, रा. कॅम्प कौलारू, सर्जेपुरा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सध्या दहावीत शिक्षण घेत होता. हल्लेखोर मुलगा आठवीत शिकत असून दोघेही एकाच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सर्जेपुरा येथील कॅम्प कौलारू परिसरात राहणार्या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद होते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी हल्लेखोर मुलाच्या वडिलांनी मुस्तकीनच्या घरात येऊन देखील वाद घातला होता. शाळेत देखील दोघांमध्ये पूर्वी तणावाचे वातावरण होते.
बुधवारी शाळा सुटल्यावर पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. त्याचा परिणाम अत्यंत भीषण ठरला. वादानंतर मुस्तकीन हा शाळेच्या ऑफिसजवळ उभा असताना संशयित आरोपी आठवीतील मुलाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्याने मुस्तकीनच्या मानेवर वार केला आणि नंतर चाकू पोटात खुपसला. या भीषण हल्ल्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित शिक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत मुस्तकीनला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत मुस्तकीनचे वडील तन्वीर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला गुरूवारी बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शाळा प्रशासन व पालकांमध्ये संताप
शाळेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्याच्या हातात चाकू कसा काय आला, आणि शाळेत तो कसा नेला गेला, यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर शाळा प्रशासनासमोर जबाबदारीची भावना आणि सुरक्षा यंत्रणेचा पुन्हा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.




