पुणे |प्रतिनिधी| Pune
बुधवारपासून राज्यामध्ये तापमानात घट झाल्याने गारठा जाणवू लागला असतानाच शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.
निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वाऱ्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडावा जाणवत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून, हा तीव्र कमी दाबाचा पट्टा ११ नोव्हेबरपर्यंत तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कायम राहणार असून, हा पट्टा तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडील करायकल व श्रीहरी कोटा दरम्यान थांबणार आहे.
त्याचा परिणाम म्हणून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, तर शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर या सहा जिल्ह्यांत आणि रविवारी राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.