Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगरविवार ‘शब्दगंध : मधमाशांची अस्तित्वाची लढाई

रविवार ‘शब्दगंध : मधमाशांची अस्तित्वाची लढाई

जगभरात मधमाशांच्या जवळपास 20 हजार प्रजाती आढळतात. यापैकी अधिक प्रजाती जंगलात राहतात आणि अनेक प्रजाती मानवी वस्त्यांमध्ये असलेल्या झाडांवर, इमारतींवर आपले पोळे बनवितात. परंतु ताज्या संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. संशोधनानुसार, प्रदूषण आणि कीटकनाशकांमुळे आज मधमाशांचे सरासरी आयुर्मान कमी झाले आहे. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामध्ये मधमाशांची भूमिका मोठी आहे. त्यांची संख्या घटत गेल्यास खाद्यान्नसंकट निर्माण होऊ शकते.

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

मधमाशांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रुपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाशा फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाशांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण मधमाशा जैवसाखळीमध्ये, अन्नसाखळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पृथ्वीवरील अगणित वनस्पतींची परागीकरणाची प्रक्रिया मधमाशांमुळेच शक्य होते. मधमाशा सुमारे 70 टक्के पिकांचे परागीकरण करतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास आपण जे अन्न खातो, त्याचा दोन तृतीयांश हिस्सा मधमाश्यांनी केलेल्या परागीकरणातूनच आपल्याला मिळतो. त्यामुळेच महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनीही सांगितली होती. ते म्हणाले होते, ज्यावेळी मधमाशा या पृथ्वीतलावरून नामशेष होतील, तिथून पुढे मानवी वंशाला जगण्यासाठी अवघी चार वर्षे मिळतील. मधमाश्या राहिल्या नाहीत तर परागीकरण होणार नाही आणि पशूंसह माणसेही जगू शकणार नाहीत.

- Advertisement -

हा धोका त्यांनी अनेक वर्षांपूर्वी निर्देशित केला होता. परंतु त्यातून कोणताही बोध मानवी समूहाने घेतला नाही. परिणामी, आज मधमाश्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. नुकतेच काही शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन करुन मांडलेल्या निष्कर्षांनुसार जगभरात मधमाशांवर अनेक प्रकारची संकटे घोंघावत आहेत. प्रचंड वेगाने वाढणारे वायूप्रदूषण आणि कीटकनाशके व रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आज मधमाशांचे आयुर्मान कमी झाले आहे.

काही वर्षांपूर्वी फ्रांसिसी नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅग्रिकल्चर, फूड अँड एन्व्हायरमेंटने आपल्या एका अहवालात असे म्हटले की, परागीकरण करणार्‍या कीटकांना शेतात वापरण्यात येणार्‍या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या अहवालानुसार, जगंलातील झाडेझुडपांच्या अनेक प्रजातींच्या फुलांमध्ये परागकण आणि रसाचे म्हणजेच मकरंदाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फटका मधमाशांनाही बसतो आहे. अनेक अभ्यासकांच्या मते, जागतिक तापमानवाढीचा (ग्लोबल वॉर्मिंगचाही) फटका मधमाश्यांना बसतो आहे. वातावरण बदलामुळे सृष्टीचक्र बदलले आहे. असमान पाऊसमान, दुष्काळ, पूर यांचाही मोठा परिणाम मधमाशांवर पडतो आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मते, मानवासाठी उपयुक्त असणारी 75 टक्के फळे आणि बीजधारक शेतीपिके परागीकरण करणार्‍या कीटकजीवांवर अवलंबून आहेत. 2019 मध्ये शास्त्रज्ञांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, जगभरात कीटकांच्या एकूण प्रजातींपैकी जवळपास 50 टक्के प्रजाती नष्ट होत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कीटकांची एकतृतियांश संख्या या शतकाच्या शेवटी पृथ्वीवरून नामशेष होऊ शकते. संशोधन अहवाल आणि आकडे हे बाजूला ठेवले तरी मधमाशांसारखे कीटक अलीकडील काळात फारसे दिसत नाहीयेत, ही बाब स्पष्ट आहे. भारतातील ओडिशा प्रांतातील शेतकरी 2002 पासून दरवर्षी आपल्या शेतात जाणार्‍या मधमाघांची संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवितात. मधमाशांची केवळ एकच नव्हे तर अनेक प्रजाती लुप्त होत आहेत. एपिस मेलिफेरा, एपिस डोरसाटा, एपिस सेरॅना इंडिका अशा अनेक प्रजातींचा त्यात समावेश आहे. मधमाशा शेताकडे कमी प्रमाणात जातात, हा अनुभव एकट्या ओडिशातील शेतकर्‍यांनाच आलेला नाही. पंजाब, केरळ, महाराष्ट्र आणि त्रिपुरातील शेतकर्‍यांकडूनही अशाच स्वरूपाची माहिती मिळत आहे. मधमाश्यांच्या अनेक प्रजाती लुप्त होत असल्याच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येत आहेत.

काही वर्षांपूर्वी मधमाशांचे पोळे सर्रास दृष्टीस पडायचे. पण आता महानगरांतून तर ते जवळपास हद्दपारच झाले आहे. ग्रामीण भागातसुद्धा मधमाशांची पोळे क्वचितच आढळून येताहेत. यामागचे खरे कारण म्हणजे त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या घटकांची कमतरता. पाण्याचे स्रोत, फुलझाडे ही मधमाशांची प्राथमिक गरज आहे. पण त्यामध्ये घट झाल्यामुळे मधमाशांचे जीवन धोक्यात आले आहे. याशिवाय बदलत्या पर्यावरण परिस्थितीमुळेही कीटकांपुढे वेगवेगळी संकटे उभी राहिली आहेत. शेतापासून बगिच्यांपर्यंत कीटकनाशक आणि रसायनांचा वाढता वापर मधमाशांच्या प्रजननास मारक ठरत आहे.

फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या मतानुसार, जगभरात उत्पादित अन्नधान्यापैकी एकतृतीयांश अन्नधान्यांचे उत्पादन मधमाशांवर निर्भर असते. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणासंबंधी संस्थेच्या मतानुसार कीटकनाशकांमुळे मधमाशांच्या स्मरणशक्तीवर थेट परिणाम होतो आहे. फुले किंवा फळे यांचा गंध घेण्याची मधमाशांची शक्ती कीटकनाशकांच्या संपर्कात येताच कमी होते. त्यामुळे त्या नेमक्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत आणि परागीकरणाची प्रक्रिया विस्कळीत होते.

पिकांवर फवारलेली रसायने परागकणांसोबत मधमाशांच्या शरीरात पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात अनेक संशोधने मागील दोन दशकांपासून सुरू असून त्यातून एक सार्वत्रिक चित्र समोर येत आहे, ते म्हणजे मधमाशा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आता प्रश्न उरतो तो यामुळे उद्भवणार्या संकटाचा सामना करण्यास आपण तयार आहोत का? ज्या वेगाने जगभरात कीटकजीवांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे अन्नधान्योत्पादनात घट झाल्यास मानव काय करणार? ज्या क्षणी मधमाश्या पूर्णांशाने नामशेष होतील, त्या क्षणापासून तीन महिन्यांच्या आत जगभरातील पिकांचे उत्पादन घटेल. सहाच महिन्यांत आपल्याला सर्व शेतांमध्ये केवळ गहू आणि मक्याची पेरणी करावी लागेल; कारण याच दोन पिकांचे परागीकरण हवेद्वारे होते. आपला आहार मर्यादित होईल. कुपोषणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या डोके वर काढतील. औषधपाण्यावरचा खर्च वाढेल. ही भयावह स्थिती ओढावू द्यायची नसेल तर आपल्याला हे संकट मुळापासून समजून घ्यावे लागेल आणि त्यादिशेने योग्य पावले उचलावी लागतील. यामध्ये शेतांमधील कीटकनाशकांचा वापर नियंत्रणात आणणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापर कमी करणे, जैविक-सेंद्रीय शेतीकडे वळणे, सर्वोच्च प्राधान्य देऊन वायूप्रदुषण कमी करणे यांसारख्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने कृती झाली पाहिजे. अन्यथा मधमाशांच्या पाठोपाठ मानवजातीच्या र्‍हासाची सुरुवात होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या