नाशिक | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या सुपर ५० च्या निवड परिक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून रविवारी दिनांक १६ जुलै रोजी जिल्ह्यातील १७ परीक्षा केंद्रांवर सकाळी १० ते १२.३० या वेळेत परिक्षा घेण्यात येणार आहे. आतापावेतो ४९६९ विद्यार्थ्यांनी निवड परिक्षेसाठी नोंदणी केली असून यापैकी १९६६ मुलेतर ३००३ मुलींनी सुपर ५० ला पसंती दिली आहे.
जिल्हाभरातून सुपर ५० ची नोंदणी वाढावी यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत ३ वेळा वाढविण्यात आली होती. यानंतरही विद्यार्थ्यांना परिक्षेस बसु देण्यासाठी परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर ७० टक्के किंवा ७० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क असल्याचे मार्कसीट् तसेच आधारकार्ड दाखविल्यास त्यांना परीक्षेस बसण्यास परवागनी दिली जाणार आहे.
निवड प्रक्रियेच्या वेळी या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. याचबरोबर आजपासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी लिंक ओपन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सुपर ५० चा लाभ घ्यावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना स्पष्ट केले. मागील वर्षी सुपर ५० साठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र यंदा विद्यार्थ्यांची संख्या बघता हा आकडा वाढवून सुपर ११० करण्यात आला आहे.