दिल्ली | वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान काल पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान विरोधात मोठी भूमिका जाहीर केली होती. या नंतर आज या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, दोन तास चालेल्या या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. सर्व पक्षीय नेत्यांकडून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध कण्यात आला आहे. आम्ही सरकार सोबत आहेत, या प्रकरणात आम्ही सरकारच्या प्रत्येक कृतीचं समर्थ करू असं यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या बैठकीमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्यानंतर सरकारकडून आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. ही घटना खूप दुख:दायक आहे, या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. बैठकीत सुरक्षेतील त्रुटींवरही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक महत्त्वाची पाउलं उचलली जात आहेत, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, भाजप नेते किरेन रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी हे बैठकीला उपस्थित राहिलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये होते.