मुंबई । Mumbai
भाजपकडून महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे व शरद पवारांवर निशाणा साधला. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एवढे यश त्यांना मिळाले असले तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावे लागत आहे. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड येथील संतोष देशमुख प्रकरणावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता, असे खोचक प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
बीड प्रकरणात आम्ही राजकारण आणलेले नाही, आणणार नाही. वाल्मीक कराडची कृती राक्षसी आहे. माध्यमांनी हे दाखवले आहे. सुरेश धस, बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया सगळ्यांनीच या गोष्टी सांगितल्या. आम्ही वाल्मीक कराड नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. इथे अन्याय, अत्याचार होत असताना गप्प बसायचे का? अशी सवाल सुप्रिया सुळे यांनी केली.
अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?
१९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली, असं अमित शाह म्हणाले होते.