मुंबई । Mumbai
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) काल, शनिवारी (२२ मार्च २०२५) मुंबईतील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. सुशांतच्या मृत्यूला तब्बल पाच वर्षे उलटल्यानंतर सीबीआयने हा अहवाल दाखल केला असून, त्यात सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कोणतीही व्यक्ती जबाबदार नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “सुशांतच्या मृत्यूला खून ठरवण्याइतपत कोणताही ठोस पुरावा आम्हाला मिळाला नाही. सुशांतची बहीण प्रियंका सिंग हिने त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तिची चौकशी करण्यासाठी आम्ही बराच काळ वाट पाहिली, परंतु ती सीबीआयसमोर हजर झाली नाही. वैज्ञानिक पुराव्यांचाही अभ्यास करण्यात आला, परंतु त्यातून कोणत्याही गैरप्रकाराचा खुलासा झाला नाही. अखेर पाच वर्षांच्या तपासानंतर हा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.”
सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्याच्या वडिलांनी, के. के. सिंग यांनी सुशांतची हत्या झाल्याचा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता, परंतु नंतर तिला जामीन मिळाला आणि आता सीबीआयने तिला क्लीन चिट दिली आहे.
या तपासात सीबीआयने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानाच्या (एम्स) फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली होती. एम्सच्या टीमनेही सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट केले होते. सीबीआयच्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल असा कोणताही गुन्हेगारी कट किंवा गैरकृत्य आढळून आले नाही.
सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत पटना येथे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र, आता सीबीआयने आपल्या अहवालात कोणतेही कारस्थान किंवा कट नसल्याचे सांगत रिया चक्रवर्ती तसेच इतर आरोपींना क्लीन चिट दिली आहे. या अहवालावर आता विशेष न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर या प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडवून दिली होती. सोशल मीडियावर अनेकांनी हा खून असल्याचा दावा केला होता, तर काहींनी
यामागे मोठे षड्यंत्र असल्याचेही म्हटले होते. आता सीबीआयच्या या क्लोजर रिपोर्टमुळे या प्रकरणातील तपासाला पूर्णविराम मिळाला असून, सुशांतच्या चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.