मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधान केले आहे.
काय केली आहे पोस्ट?
एक्स वरील पोस्टमध्ये सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग करत म्हंटले आहे, राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल? असा थेट सवालही सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरेंना केला आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरारोडमध्ये एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता सुशील केडिया यांची राज ठाकरे यांना आव्हान देणारी ही पोस्ट समोर आली आहे. आता मनसेकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, या पोस्टवर नेटिझन्सकडून सुशील केडियांना लक्ष्य केले जात असताना त्यावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंवर टीका केली आहे. “मराठी भाषा न शिकणे हा त्यांचा अपमान नाही. पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे राजकारण आणि गुंडगिरी करणे हा त्यांचा अपमान आहे हे निश्चित”, अशी पोस्ट सुशील केडियांनी केली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुशील केडिया यांनी धमक्याही दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे केडिया यांनी आणखी एक ट्विट केले असून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आपणास धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे सुरक्षा मिळावी, अशी मागणीही केली आहे. भारताचा एक नागरिक म्हणून मला महाराष्ट्रात, मुंबईत सुरक्षित आणि मान-सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा धमक्यांमुळे यावर प्रश्न उपस्थित होत असल्याचेही सुशील केडिया यांनी ट्विटमधून म्हटले आहे.
कोण आहे सुशील केडिया?
सुशील केडिया हे उद्योजक असून केडिया नॉमिक नावाची त्यांची कंपनी आहे. शेअर मार्केट गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट क्षेत्रातील नामांकीत व्यवसायिक म्हणून त्यांची मुंबईत ओळख आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते मुंबईत राहत असून व्यवसाय करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





