Saturday, July 27, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायत सदस्य मासिक बैठकीसाठी उदासीन

टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य मासिक बैठकीसाठी उदासीन

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या व राजकीय प्रतिष्ठेच्या 17 सदस्य संख्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत सदस्य सदस्यपदाची जबाबदारी झुगारुन मासिक बैठकांना दांडी मारीत आहेत. गावगाडा चालवण्यास ते असमर्थ दिसत असल्याने गेल्या दोन वर्षात जवळपास 10 बैठका कोरमअभावी पुढे ढकलल्याची धक्कादायक माहिती काल आयोजित मासिक बैठकीत पुढे आली.

- Advertisement -

टाकळीभान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 17 आहे. गेल्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या 16 सदस्यांना निवडून देऊन एकहाती सत्ता दिली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकहाती सत्ता अजिर्ण झाल्याने सहा महिन्यांच्या गोडीगुलाबीच्या संसारानंतर नेत्यांच्या ईगोमुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सत्तेची शक्ल झाली. त्याचा फटका आजपर्यंत प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला मतदान केलेल्या मतदार नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचातीची विकास कामे रोडावल्याने नागरिकांच्या समस्यांत वाढ झाली असली तरी सदस्य व त्यांचे नेते ईगोत अडकल्याने समस्या सोडवण्यासाठी वेळ द्यायला तयार नाहीत.

विद्यमान सदस्यांत 9 महिला सदस्य आहेत तर 8 पुरुष सदस्य आहेत. सरपंचपदी महिला विराजमान असल्या तरी मासिक बैठकीला महिला सदस्यांना उपस्थित ठेवण्यास त्या कमी पडल्याचे दिसून येते. त्यामुळे महिला सदस्यांच्या पतिचाच कामकाजात हस्तक्षेप आजपर्यंत दिसून आलेला आहे. कागदी घोडे नाचवण्यासाठी अनेक सदस्यांच्या इतिवृत्तावर घरबसल्या सह्या घेतल्या जात आहेत. सत्ताधारी गटाच्या कार्यकाळात एकूण 27 मासिक बैठका झालेल्या असल्या तरी त्यापैकी सुमारे 10 बैठका गणपूर्ती (कोरम) अभावी तहकूब कराव्या लागल्या आहेत. मासिक बैठकीचा अजेंडा 3 दिवस अगोदर देण्याचा नियम असला तरी 7 दिवस आगोदर अजेंडा देऊनही सदस्यांची बैठकीला दांड्या मारल्याचे दिसून येते.

नियमित बैठक तहकूब केल्यानंतर त्याच महिन्यात घेण्यात येणार्‍या बैठकीला कोरमची आवश्यकता नसल्याने त्या बैठकीत कामकाजाचे निर्णय घेण्याची प्रथा या ग्रामपंचायतीत रुढ होताना दिसत आहे. काल गुरुवार दि. 27 जुलै रोजीची आयोजित मासिक बैठकही केवळ 7 सदस्य उपस्थित असल्याने गणपूर्ती अभावी तहकूब करावी लागल्याने आतापर्यंत तहकूब झालेल्या बैठकींचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे नियमित बैठक तहकूब होऊन पुढील चार पाच दिवसांत घेण्यात येत असली तरी त्या तहकूब बैठकीचे इतिवृत्त नियमित बैठकीच्या तारखेलाच घेण्यात येत असल्याचीही माहिती यावेळी समोर आली आहे.

बैठकीसाठी उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्य दीपक पवार, सुनील त्रिभुवन, अशोक कचे, सदस्य पती जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, सरपंच पती यशवंत रणनवरे, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव उपस्थित होते.

काही सदस्य नियमित बैठकीला वारंवार गैरहजर राहत असल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्याचा पायंडा पाडला जात आहे. आम्ही प्रत्येक बैठकीला वेळेपूर्वी हजर असतो. मात्र काही सदस्य जाणूनबुजून गैरहजर राहून तहकूब बैठकीत सोयीचे कामकाज करुन घेत आहेत. नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मासिक बैठकीतच चर्चा होणे गरजेचे आहे. मासिक बैठकीसाठी वेळ नसलेल्या सदस्यांनी पद अडवून बसण्यापेक्षा पदाचे राजीनामे द्यावेत.

कान्हा खंडागळे, उपसरपंच

नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्या सोडविण्यासाठी बैठकीत चर्चा होणे गरजेचे आहे. समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी आम्ही बैठकीसाठी वेळ देतो. मात्र कोरम अभावी सभा तहकूब होत असल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत. वारंवार ठराविक सदस्यांमुळे बैठक तहकूब होणे हा गंभीर प्रकार सुरु झाला आहे.

दीपक शंकरराव पवार, सदस्य ग्रामपंचायत.

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी नुसार मासिक बैठकीच्या तीन दिवस आगोदर सदस्यांना अजेंडा देणे गरजेचे असले तरी सहा ते सात दिवस आगोदर सदस्यांना मासिक बैठकीचा अजेंडा दिला जातो. सचिव म्हणून बैठकीचे कामकाज नियमानुसारच केले जाते.

रामदास जाधव, ग्रामविकास अधिकारी

सरपंच या अचानक अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याने मासिक बैठकीला उपस्थित राहु शकल्या नाहीत.

यशवंत रणनवरे, सरपंच पती

- Advertisment -

ताज्या बातम्या