अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणार्या 4644 पदांसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जुलै असून अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवस म्हणजे 18 जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर शुल्क भरण्यासाठी 20 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.
राज्यात 36 जिल्हे असून महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागांतर्गत अगदी गावपातळीवर तलाठ्यांमार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे चार हजारांहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमुळे महसुलासंदर्भात गाव पातळीवर विविध प्रकारचे कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात 250 पदांसह राज्यातील 4644 जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत दहा लाखांवर अर्ज आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून मिळाली. तसेच अर्जदारांची सख्या वाढल्यामुळे उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आता 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.