तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव दिघे भागातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी तळेगाव दिघे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे तळेगाव भागातील 16 लाभार्थी गावांमधील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहे. याप्रश्नी पदाधिकारी व ग्रामस्थांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत उपाययोजना करण्यासाठी साकडे घातले.
सदर योजनेमधून तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, काकडवाडी, देवकौठे, तिगाव, नान्नज दुमाला, कौठेकमळेश्वर, लोहारे, कासारे, वडझडी बुद्रुक, वडझडी खुर्द, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, करूलेसह 16 गावांचा समावेश होतो. मागील तीन महिन्यांपासून ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. योजनेच्या तलावाचे नूतनीकरण काम सुरू असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, यावर पर्याय म्हणून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीत मोटार टाकून चालवणे शक्य होते. मात्र, प्रशासनाने याबाबत उदासीनता दर्शवली. आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाण्याची कमतरता भासत आहे.
तळेगाव भाग हा दुष्काळी पट्टा असून पिण्याच्या पाण्यासाठी थेट प्रवरेची पाईपलाईन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाली. मागील पंधरा वर्षे ही योजना सुरळीत चालू होती. विजेच्या बिलाअभावी अनेकदा वीज कनेक्शन कट केले गेले. मात्र माजी मंत्री थोरात यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजनांमधून वीजबिल भरून ही योजना सुरू ठेवली. ज्या ज्या वेळा पाईपलाईन तुटली त्यावेळेस सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा मदतीला धावली, असे संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी स्पष्ट केले.
थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री-अपरात्री काम करून कारखान्याच्या यंत्रणेने 16 गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु ठेवण्यासाठी काम केले. त्यामुळे प्रत्येक गावाला चार दिवसांतून पाणी मिळत होते. माजी मंत्री थोरात हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे जनतेला अडचण भासत नव्हती. या योजनेमध्ये काही अडचण आली, तर तत्काळ सोडवली जायची. किंबहुना मंत्रिपदाच्या काळात अत्यंत व्यस्त कार्यक्रमातही त्यांनी कायम या योजनेची काळजी घेतली. मात्र आता उन्हाच्या चटक्याबरोबर तळेगाव भागातील जनतेला नेतृत्वाच्या छत्राचे चटकेही बसू लागले आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले आणि काही लोकांना हर्ष झाला. या परिसरामध्ये येऊन त्यांनी भाषणे केली. मात्र पिण्याच्या पाण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. किंबहुना या योजनेबाबत त्यांना काही माहीत नाही किंवा त्यांची मोठी उदासीनता आहे, असे संगमनेर शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी सांगितले.