मोदलपाडा/सोमावल | वार्ताहर – TALODA
तळोदा येथील कॉंग्रेसचे (Congress) नगरसेवक गौरव वाणी व सुभाष चौधरी हे उद्या दि.५ नोव्हेंबर रोजी मुंबई (mumbai) येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये (bjp) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा झटका मानला जात आहे. हे दोन्ही नगरसेवक माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी (Adv. Padmakar Valvi) व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांचे निकटवर्तीय आहेत. यांच्या भाजपामध्ये जाण्याने कॉंग्रेस पक्षाचे नुकसान तर होणार आहे परंतु या व्यतिरिक्त तालुक्यातील कॉंग्रेस पक्षातील अजून कोणते पदाधिकारी पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करतील याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे.
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…
तळोदा येथील नगरपालिकेच्या निवडणूकीत गौरव वाणी हे सलग दुसर्यांदा कॉंग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तर सुभाष चौधरी यांच्या पत्नी याआधी कॉंग्रेसच्या नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी सुभाष चौधरी यांना कॉंग्रेसने स्वीकृत नगरसेवक पद दिले होते.
आता श्री.चौधरी हे कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत. बर्याच महिन्यांपासून कॉंग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. परंतु कॉंग्रेसचे दुसरे नगरसेवक सुभाष चौधरी हेही भाजपाच्या वाटेवर आहेत. याबाबत शक्यता वर्तवण्यात येत नव्हती.
मात्र, आता सुभाष चौधरी सुद्धा गौरव वाणी यांच्यासोबत प्रवेश करीत असल्याने कॉंग्रेस गटाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा शक्ती प्रदर्शन करत होणार असल्याने तालुक्यातील मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथील कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
यात प्रामुख्याने भाजपाचे आ.राजेश पाडवी, लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अनेक जण भाजपाच्या वाटेवर
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे नुकसान होऊन फक्त १३ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसला वर्चस्व राखता आले. परंतु कॉंग्रेस पक्षात नेतृत्वाच्या अभावामुळे सधस्थितीत अजून काही ग्रामपंचायती व त्यातील निवडून आलेले कॉंग्रेसचे पदाधिकारी हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. असे झाले तर तालुक्यात कॉंग्रेस खिळखिळी होईल हे निश्चित आहे.
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…
गळती रोखण्याचे कॉंग्रेस श्रेष्ठींसाठी आव्हान
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी सुद्धा कॉंग्रेसमधील दुफळी व समन्वयाचा अभाव जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक यांनी थेट उपाध्यक्ष पदावर मुसंडी मारुन कॉंग्रेसला झटका दिला. या अनुषंगाने जिल्ह्यातील कॉंग्रेसची गळती कॉंग्रेसच्या नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे. यापुढेही गळती रोखण्याचे आव्हान कॉंग्रेस नेतृत्वासमोर आहे.