Sunday, January 25, 2026
Homeराजकीयमुंबईत अखेर ठरले! ठाकरे बंधूं आणि शरद पवार यांच्यात जागावाटपाचे समीकरण स्पष्ट,...

मुंबईत अखेर ठरले! ठाकरे बंधूं आणि शरद पवार यांच्यात जागावाटपाचे समीकरण स्पष्ट, कोण किती जागा लढणार?

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, सुमारे दोन दशकांनंतर ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, या ठाकरे बंधूंच्या युतीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही साथ दिली आहे. मुंबईत आता ही नवी ‘प्रादेशिक शक्ती’ निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत या तिन्ही पक्षांच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुंबईवर सत्ता राखणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला १५४ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ६३ जागा देण्यात आल्या आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांनी याआधीच त्यांच्या सात उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.

YouTube video player

मुंबई महापालिकेच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच झेंड्याखाली आल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या युतीमध्ये तिन्ही प्रमुख पक्ष हे ‘प्रादेशिक’ स्वरूपाचे आहेत. “मुंबईच्या हितासाठी तीन प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच सुरुवातीला महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे वाटत होते, परंतु राज ठाकरेंच्या सहभागामुळे येथील समीकरणे बदलली आहेत.

राज ठाकरे यांच्या युतीमधील प्रवेशामुळे काँग्रेसने या आघाडीतून दूर राहून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचा परप्रांतीयांना असलेला विरोध आणि त्यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका काँग्रेसला मान्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे मुंबईत आता महायुती, ठाकरे-पवार युती आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जागावाटपाची आकडेवारी:

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): १५४ जागा
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे): ६३ जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार): १० जागा

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...