सप्तशृंगीगड । वार्ताहर
सप्तशृंगीगडावर उद्या, शनिवार, दि.5 एप्रिल पासून चैत्रोत्सवास प्रारंभ होत असल्याने आदिशक्ती भगवतीच्या पावननगरीत चैत्रोत्सवादरम्यान होणार्या गर्दीच्या अनुषंगाचे आढावा घेत प्रशासन सज्ज होताना दिसून येत आहे.
नंदुरबार, धुळे, शिरपूर तसेच संंपूर्ण जगभरात सप्तशृंगी देवीच्या चरणी लाखो भाविक हजेरी लावतात. या यात्रेत सहभागी होणार्या भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तसेच सप्तशृंगीगड ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महामंडळ, महावितरण कंपनी, रोप-वे ट्रॉली, वनविभाग, आपत्ती विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिेले आहेत.
मात्र भाविकांना अजून सुविधा कशा द्याव्यात याबाबत चर्चादेखील सुरू आहे. त्याच अनुषंगाने सप्तशृंगीगडाचा विकासकामांचा आढावा जिल्हाधिकार्यांनी घेतला असून भाविकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात याबाबत प्रशासन लक्ष घालत आहे. अनेक दुकानदारांनी श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर यात्रेसाठी आपली दुकाने थाटली आहेत. रस्त्याच्या मध्यभागी भव्य दिव्य पथदिवे लावून सप्तशृंगीगडाचे सुशोभीकरण दिसून येत आहे. तसेच यात्रेची लगबग गडावर पाहावयास मिळत आहे.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर यात्रेदरम्यान हजारो भाविक सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन होतात. या यात्रेत भाविक भक्तांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
खगेंद्र टेंभेकर, पोलीस निरीक्षक, कळवण