Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यापायवाट अडवल्याने दिवसभर रखडला अंत्यसंस्कार

पायवाट अडवल्याने दिवसभर रखडला अंत्यसंस्कार

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथे रस्ता नाही म्हणून मंगळवारी गरोदर मातेला बाळासह आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आज टाके घोटी येथेही मरण अवघड झाल्याची घटना घडली आहे. येथील आदिवासी कातकरी पाड्यावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक एका शेतकर्‍याचा शेतातील पायवाटेने ये जा करतात.

- Advertisement -

कातकरी पाड्यावरील वस्तीत आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असतांना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका असे सांगत मज्जाव केला. म्हणून हा अंत्यविधी दिवसभर अडून पडला होता. याबाबत इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलीस यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्तात पायवाट मोकळी करून दिली. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेवून अंत्यविधी करण्यात आला.

एकीकडे रस्ता नाही म्हणून रुग्णाला जीव गमवावा लागतो तर दुसरीकडे मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. आदिवासी कातकरी समाजासाठी आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आहेत. मात्र कातकरी वस्त्यांमध्ये त्या योजना पोहोचल्या नाहीत. म्हणूनच अनेक गावांत आदिवासींची दशा अजूनच बिघडत आहे अशी प्रतिक्रिया एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या