अहमदनगर । प्रतिनिधी
जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या नेमणूका आणि बदलीच्या प्रक्रियेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी बाजी मारत रिक्त जागांवर सोयीनूसार नेमणूका पदरात पाडून घेण्यात यश मिळवले.
त्यातच भर म्हणून पवित्र पोर्टलने नियुक्त दिलेल्या शिक्षकांना देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शुक्रवार (दि.26) नेमणूका दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण रिक्त असणार्या 450 जागांपैकी 182 जागा भरल्या गेल्या असून आता केवळ 268 जागा शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे जिल्हातंर्गत बदलीसाठी 3 हजार 800 अर्ज केलेल्या गुरूजींचे बदली प्रक्रियेचे टेन्शन कमालीचे वाढले आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे यंदा गुरूजींच्या बदल्या लांबल्या आहेत. आता ऑगस्ट महिना उजाडण्याची वेळ आली असून राज्य सरकार अथवा ग्रामविकास विभागाकडून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुस्पष्ट मार्गदर्शन अथवा आदेश न आल्याने प्रत्येक जिल्हा परिषद पातळीवर वेगवेगळ्या पध्दतीने शिक्षकांच्या बदल्याची अथवा आंतरजिल्हा बदलीने बालेल्या अथवा पवित्र पोर्टलव्दारे नियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.
याला नगर जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण विभाग अपवाद नाही. दरम्यान, 15 दिवसांपूर्वी झालेल्या पालकमंत्री यांच्या नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनेनूसार जिल्ह्यात यंदा आधी आंतरजिल्हा बदलीनेबदलून आलेल्या शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा दाखवून त्याठिकाणी त्यांना नेमणूका देण्यात आल्या.
अशा प्रकारे नेमणूक दिलेल्या आंतरजिल्हा शिक्षकांची संख्या 144 आहे. दरम्यान, जिल्ह्यात शिक्षकांच्या 450 जागा रिक्त होत्या. आंतरजिल्हा शिक्षकांना नेमणुकीची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पारपडल्यानंतर शुक्रवारी (दि.26) रोजी प्राथमिक शिक्षण विभागाने पुन्हा पवित्र पोर्टलव्दारे नियुक्त्या दिलेल्या 35 आणि आणखी 3 अशा 38 शिक्षकांना रिक्त जागांनूसार ऑनलाईन समुपदेशनाव्दारे नेमणूका दिल्या. आधीच्या 144 आणि त्यानंतर 38 अशा रिक्त असणार्या 450 पैकी 182 ठिकाणाच्या रिक्त जागा भरल्याने आता जिल्हातंर्गत शिक्षकांना बदलीमध्ये चॉईस घेण्यासाठी अवघ्या 268 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, यंदा जिल्हातंर्गत बदलीसाठी 3 हजार 800 शिक्षकांनी अर्ज केलेले आहेत. या शिक्षकांना रिक्त असणार्या 268 जागा दाखवल्यास एकाएका जागेसाठी चुरशीची स्पर्धा होणार आहे आणि त्यात आपला नंबर लागणार की नाही, या विचाराने जिल्ह्यातील गुरूजी चांगलेच धास्तावले आहेत. आधीच्या रिक्त जागांवर नेमणूका मिळवण्याच्या स्पर्धेत आंतरजिल्हा शिक्षकांनी जिल्हातंर्गत बदलीसाठी पात्र असणार्या शिक्षकांवर मात करत नेमणूका घेतल्या आहेत.
त्यात पवित्र पार्टलवाल्यांची देखील लॉटरी लागली असून यामुळे जिल्हातंर्गत बदलीसाठी प्रयत्न करणारे शिक्षकांची मोठी गोची झालेली आहे. दरम्यान, शिक्षकांच्या नियमित जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेचे आदेश निघालेले नाहीत आणि जिल्हा परिषद पातळीवर त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे यंदा जिल्हातंर्गत बदलीसाठी प्रयत्न करणार्या शिक्षकांची मोठी विचित्र अवस्था झालेली आहे.
शिक्षक संघटनांचा दरारा संपला
नगर जिल्ह्यात काही वर्षापूर्वी शिक्षक संघटनांचा प्रशासनावर मोठा दरारा होता. शिक्षक संघटनाच्या मर्जीशिवाय अथवा त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय जिल्हा परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी अथवा शिक्षण विभाग निर्णय घेत नव्हते. मात्र, गुरुजीच्या राजकारणात नगर सारख्या बड्या जिल्ह्यात शिक्षक संघटनाच्या ठिकर्या उडाल्या आणि त्याचा परिणाम प्रशासनावर झाला. यामुळे प्रशासन आता शिक्षक संघटनांना साधे विचारात देखील नसल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी त्यांच्या अंतर्गत राजकारणापोटी संघटनेच्या मोठ्या शक्तीला गमावले असल्याची प्रतिक्रिया समान्य शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.