सिन्नर । Sinner
वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडांची वनविभागाकडून निगा राखण्यात येत आहे. झाडांभोवती पावसाळ्यापूर्वी लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या संरक्षक जाळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले असून परिसरातीलच काही शेतकरी आपल्या बांधावरील झाडांसाठी या जाळ्यात काढून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून दोन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात वावी ते पंचाळे दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले आहे. उन्हाळ्यात सुमारे साडेचार हजार झाडांना संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या. मात्र, या जाळ्या आता चोरट्यांचे लक्ष ठरू लागल्या आहेत. परिसरातील काही शेतकरी या जाळ्या काढून आपल्या शेतात लावलेल्या झाडांसाठी किंवा कोंबड्यांच्या खुराड्या साठी त्यांचा वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पाठलाग करून अशाप्रकारे जाळ्याची चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा हटकवले आहे. तरीदेखील हे प्रकार सर्रास सुरू असल्याने रस्त्यालगत लागवड केलेल्या झाडांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.