पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील माणिकदौंडी घाटातील केळवंडी शिवारात ऊस तोडणी कामगाराच्या ट्रॅक्टरचा शनिवारी (दि.22) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत आठ कामगार जखमी झालेे. सहाजण गंभीर जखमी असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. दोघे किरकोळ जखमी झाले.
अंबादास सदाशिव खोत, शोभा अंबादास खोत, कविता राजेंद्र शेटे, राजू मुरलीधर शेटे, अशोक बन्सी चन्ने (रा. केळवंडी ता. पाथर्डी), भीमा शिवा खंडागळे, शिलाबाई भीमा खंडागळे, किरण भीमा खंडागळे(रा. अघोरी, बोधेगाव, ता. शेवगाव) अशी अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखानाहून हे ऊस तोडणी कामगार परतीच्या प्रवासा दरम्यान आपल्या गावी येत होते. शनिवारी ट्रॅक्टर ट्रॉलींसह घाटातील केळवंडी शिवारात धोकादायक वळणावर ताबा सुटून पलटला. कामगार त्यांचा गाव शिवारात आल्यानंतर हा अपघात झाला. ट्रॅक्टरचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालक अंबादास सदाशिव खोत ट्रॅक्टर झाडाला धडकून थांबण्याचा प्रयत्नात होता.
मात्र त्यापूर्वीच ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या पलटल्याने अपघात झाला. अपघातानंतर ट्रॉलीमध्ये असलेले संसारोपयोगी साहित्य आणि कामगार रस्तावर पडलेे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, राजेंद्र म्हस्के, अक्षय वडते, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील ओव्हळ, अॅड.आर.एन. शेटे यांच्यासह स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. माणिकदौंडी घाटात अपघात होण्याची मालिका सातत्याने सुरू आहे. या घाटात धोकादायक वळणे असून ते वळणे काढून घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.