नांदेड | Nanded
नांदेड शहरानजीक असणाऱ्या आलेगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने मोठी जिवीतहानी झाली आहे. या भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ७ वाजेदरम्यान ही घटना घडली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. २ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे आलेगाव येथे एकच खळबळ उडाली आहे.
पण पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. मजुरी करण्यासाठी आलेल्या महिलांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा