Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'सरपंच संवाद' उपक्रमाद्वारे दोनशेहून अधिक सरपंचांना प्रशिक्षण

‘सरपंच संवाद’ उपक्रमाद्वारे दोनशेहून अधिक सरपंचांना प्रशिक्षण

नाशिक | प्रतिनिधी

सरपंचांनी विविध योजनांचा अभ्यास केल्याने गावाचा खऱ्या अर्थाने विकास होईल आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा आदिवासी कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासातील उद्दीष्टांचे स्थानिकीकरण या विषयावर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीयाचा सरपंच संवाद हा उपक्रम, क्वालिटी सिटी नाशिक अभियान आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षमता निर्माण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने त्या बोलत होत्या. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रमांसह) दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रास ऑनलाईन हजेरी लावली.

यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर,क्वालिटी सिटी अध्यक्ष जीतूभाई ठक्कर,क्वालिटी नाशिक सिटीचे हेमंत राठी,’देशदूत’ वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, एन ए बी इ टी सीईओ डॉ. प्रो. वरिंदर कंवर, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीयाचे हिमांशू पटेल,आशिष कटारिया यांच्यासह नियामक मंडळ सदस्य, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यशाळेमध्ये नाशिकमधील दोनशेहून अधिक सरपंचांनी सहभाग घेतला. गावपातळीवर या विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये याबाबतीतसरपंचांना सुसज्ज करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

यावेळी बोलतांना मंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या कि,क्‍वालिटी कौन्‍सिल ऑफ इंडियासमवेत मिशन क्‍वालिटी सिटी नाशिक आणि सरपंच संवाद यांचे संयुक्‍त प्रयत्‍न कौतुकास्‍पद आहेत. या उपक्रमाच्‍या माध्यमातून सरपंचांचे ज्ञानवर्धन होण्यासोबत शाश्‍वत विकासाचे धेय्य गाठण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये सरपंचांना आत्‍मसात करण्याची संधी उपलब्‍ध झाली आहे. सातत्‍यपूर्ण प्रशिक्षण आणि क्षमता विकासाच्‍या माध्यमातून आम्‍ही त्‍यांना सक्षम बनवत आहोत. खेड्यांच्‍या विकासासाठी उपलब्‍ध असलेल्‍या प्रभावी शासकीय योजनांची माहिती त्‍यांना देतांनाच त्‍यासोबत व्‍यवहारात पारदर्शकतेच्‍या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाते आहे. आपण महिलांच्‍या बचत गटांच्‍या समुहाला सक्षम करण्याची आवश्‍यकता असून, त्‍यांच्‍यामध्ये उद्योजकता, व्‍यवसायिकेचे मुल्‍य रुजविण्याची गरज आहे.

पालकमंत्री ना. दादा भुसे म्हणाले कि,सरपंच हे त्यांच्या ज्ञानाचे कृतीत रूपांतर करून सकारात्मक बदल घडवणारे असतात. त्यामुळे, जनसहभागाला आणि जबाबादारीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विकसित भारत यात्रेचा महत्त्वपूर्ण भाग होण्यासाठी अशी प्रशिक्षण सत्रे वेळोवेळी आयोजित करणे अत्यावश्यक आहे.

ना. छगन भुजबळ म्हणाले कि, देशभरातील सरपंचांना एका व्यासपीठावर आणण्याची मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली संकल्पना साकार करण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘सरपंच संवाद’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे देशभरातील सुमारे अडीच लाख सरपंचाना एकाच डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणू शकेल असे अँप क्वालिटी सिटी इंडियाने कार्यान्वित केले आहे. देशभरातील सरपंचांना परस्परांशी माहिती, अनुभवाचे आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरत असूनअशा स्वरुपाचे हे देशातील पहिलेच अभियान आहे. याच अभियनाचा गावपातळीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘सरपंच संवाद’ उपक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी उपस्थित सरपंच,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांना आपल्या गावातील प्रत्येकाने मतदान करावे याकरिता शपथ देण्यात आली.

यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावात सलग २५ वर्षे सरपंच राहून त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेण्याऱ्या व गावाला २२ पुरस्कार त्यामध्ये २ वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देणारे भास्कर पेटे पाटील यांनी उपस्थित सरपंचांना आपली कारकीर्द समजावून सांगितली.

यावेळी क्रेडाई नाशिक सिटीचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी आभार मानले. या उपक्रमात सहभागी करुन घेतल्‍याबद्दल त्‍यांनी आयोजकांप्रति आभार व्‍यक्‍त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या