अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारताच चालू वर्षाच्या (सन 2025) पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (बुधवार) सकाळी 9 वाजता येथील पोलीस मुख्यालयात बदली दरबार आयोजित करण्यात आला आहे. सुमारे 400 पेक्षा जास्त पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहे.
यापूर्वीच पात्र अंमलदारांकडून बदलीसाठी पसंतीक्रमाबाबतचे अर्ज मागवले होते. मात्र, काही अंमलदारांनी अर्ज सादर केले नव्हते, अशा अंमलदारांचे पसंती अर्ज काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्हॉट्सअॅपवर मागवून घेतले गेले. तसेच, ज्या अंमलदारांची बदलीसाठी पात्रता पूर्ण झाली आहे किंवा जे अंमलदार 31मे 2020 पूर्वी पोलीस ठाणे अथवा शाखेत रुजू झालेले आहेत, पण अद्याप यादीत त्यांची नावे समाविष्ट झालेली नाहीत, त्यांनी देखील आपल्या पसंती अर्जासह प्रत्यक्षरित्या आज सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बदली प्रक्रियेमुळे पोलीस अंमलदारांना नवीन ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, प्रशासकीय कार्यक्षमता आणि सेवा वितरणामध्ये अधिक सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रशासकीय बदली पात्र अंमलदार यांचे अर्ज मागवून घेतले होते. त्यांची बदली मुंबई येथे झाली आणि त्यांच्या जागी सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारला. घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चार दिवसांत प्रशासकीय बदल्या करण्यासाठी दरबार आयोजित केला आहे. दरम्यान आज फक्त प्रशासकीय बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेक पोलीस अंमलदार यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यांना देखील आपल्या बदल्या होणार का? झाल्या तर कधी होणार याची चिंता लागून आहे.
बदलीचे आदेश, पण अंमलबजावणी अधांतरी
बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना तत्काळ बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यात यावे असे आदेश पोलीस अधीक्षक देतात. मात्र, प्रभारी अधिकारी यांच्या मर्जीतील पोलीस अंमलदार यांना कार्यमुक्त केले जात नाही. बदली होऊन देखील ते त्याच ठिकाणी कार्यरत राहतात. असा प्रकार मागील दोन वर्षांपासून जास्त पहायला मिळत आहे. त्यामुळे बदली होऊन देखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याकडे नवीन पोलीस अधीक्षक घार्गे लक्ष देणार का? याकडे पोलीस अंमलदारांचे लक्ष लागले आहे.
एलसीबीमध्ये संलग्न अंमलदारांची संख्या अधिक, मूळ नियुक्तीत विसंगती
स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदारांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. मात्र या शाखेत सायबर पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्यांतून संलग्न अंमलदारांची नेमणूक तेथे करण्यात आली आहे. यामुळे मूळ एलसीबीत नेमणूक असलेले पोलीस अंमलदार कमी आणि संलग्न अंमलदार जास्त असे चित्र एलसीबीत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील व राकेश ओला यांनी एलसीबीत कोणाला बदली दिली नव्हती. अनेक अंमलदारांची इच्छा असूनही त्यांना एलसीबीत काम करता येत नाही. काही ठराविक अंमलदार वर्षानुवर्षे एलसीबीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांची बदली झाली आहे मात्र त्यांना प्रभारी अधिकारी कार्यमुक्त करत नाहीत. याकडे पोलीस अधीक्षक घार्गे लक्ष देणार का? एलसीबीत काम करण्याची इच्छा असलेल्या पोलीस अंमलदारांना नियुक्ती मिळणार का? याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.