नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही जीव गमवावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयब्बाचा एक गट टीआरएफने (TRF) स्वीकारली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर कमांडर सैफुल्लाहने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यानंतर, द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने देखील एक निवेदन जारी करत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.
द रेझिस्टन्स फ्रंट पहलगाम घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. हल्ल्यासाठी टीआरएफला दोष देणे चुकीचे आहे. हा घाईघाईत घेतलेला निर्णय आहे. काश्मिरी प्रतिकाराला बदनाम करण्यासाठी हे सुनियोजित मोहिमेचा एक भाग आहे, असे टीआरएफने म्हटले आहे.
द रेझिस्टन्स फोर्स -टीआरएफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली होती. या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. यामधील दोन दहशतवादी स्थानिक तर चार दहशतवादी हे पाकिस्तानातील असल्याचे समोर आले होते. या दहशतवाद्यांचे रावळपिंडी आणि रावळकोट कनेक्शन आता उघड झाले आहे. तर काही निवृत्त लष्करी अधिकार्यांच्या दाव्यानुसार दहशतवाद्यांमध्ये दोन जण हे पाकिस्तानी लष्करातील कमांडो असल्याचे म्हटले होते.
सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केल्याचा दावा
टीआरएफने पोस्टमध्ये लिहिले आहे की, पहलगाममधील हल्ल्यानंतर लगेचच आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून एक खोटा संदेश पोस्ट करण्यात आला. चौकशीनंतर असे आढळून आले की, ते सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केले गेले होते. उल्लंघन निश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत. एवढेच नाही तर दहशतवादी संघटनेने या सायबर हल्ल्यासाठी भारतीय सुरक्षा संस्थांनाही जबाबदार धरले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या टीआरएफ या संघटनेने घुमजाव केले. हा हल्ला आपण केला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर त्याचवेळी टीआरएफने या हल्ल्यात आपला हात नसल्याचे म्हटले आहे. हा निश्चितच योगायोग नाही. पाकिस्तान सरकारने संघटनेवर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाह कसुरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. भारताच्या माध्यमांनी आणि सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय आम्हाला आणि पाकिस्तानला जबाबदार धरले. हे एक षडयंत्र आहे. एवढेच नाही तर कसुरीने भारताला युद्ध शत्रू म्हटले आहे. भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो. भारताने काश्मीरमध्ये 10 लाख सैन्य पाठवून युद्धाचे वातावरण निर्माण केले आहे. पहलगाममध्ये भारतानेच हल्ला केला आहे आणि तो त्यासाठी जबाबदार आहे. हे त्याचे षड्यंत्र आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा