नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) शेतकऱ्यांचे (Farmers) विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होते. त्यानंतर अखेर आज या आंदोलनावर तोडगा निघाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे…
जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री भुसेंनी आंदोलकांना तीन महिन्यांचा अवधी देत त्यांच्या मागण्यांची जबाबदारी घेतली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. त्यामुळे भुसे यांच्या शिष्टाईला यश आल्याचे पाहायला मिळाले.
शेतकरी व कष्टकरी कर्मचार्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित (Jiva Pandu Gavit) यांच्या नेतृत्वाखाली २१ फेब्रुवारीपासून चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, दिंडोरीसह इतर तालुक्यांतून हजारोंच्या संख्येने निघलेले लाल वादळ सोमवार (दि.२६) रोजी नाशिकमध्ये (Nashik) धडकले होते.
त्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या पाच बैठका झाल्या होत्या. पंरतु, त्या निष्फळ ठरल्या होत्या. यानंतर आज पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीत आंदोलनावर मार्ग निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उद्यापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.