राजूर |वार्ताहर|Rajur
ट्रक जाळून विमा कंपनीकडून भरपाई मिळविण्याचा तसेच फायनान्स कंपनीचे हप्ते बुडविण्याचा कट राजूर पोलिसांनी वेळेवर उघडकीस आणत मोठा अपघात व फसवणुकीचा प्रकार टाळला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक चौकशीमध्ये धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. सागर बाबुराव नवले (वय 31, रा. स्वच्छंद बंगला, राजबिहारी रोड, म्हसरुळ, नाशिक) याने 17 जुलै, 2025 रोजी रात्री 2.30 वाजता त्याच्या मालकीचा ट्रक (क्र. एमएच.15, एचएच.5887) विठे घाटात जळून नष्ट झाल्याची तक्रार राजूर पोलिसांत दिली होती.
ट्रक नाशिक येथील विशाल रनशेवरे चालवत होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी साक्षीदारांची सखोल चौकशी करत घटनास्थळी पाहणी केली असता ट्रकला अपघाताने आग लागलेली नसून तो मुद्दाम जाळल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या सखोल तपासानंतर उघड झाले की, सागर नवले याने त्याचे साथीदार विशाल उत्तम रनशेवरे, अमोल शरद बारगजे व लहू शंकर आव्हाड यांच्या मदतीने ट्रकमध्ये बारदाण्याच्या गोण्या टाकून लायटरने आग लावली.
त्यानंतर पोलिसांना चुकीची माहिती देत विमा व फायनान्स कंपनीला फसवण्याचा डाव आखण्यात आला होता. अखेर याप्रकरणी राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे हे करत असून पोहेकॉ. श्रीकांत नरोडे, महिला पो.ना. संगीता आहेर व पो.कॉ. अशोक गाढे त्यांना मदत करत आहे.





