पिंपळनेर – प्रतिनिधी dhule
साक्री तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील आदिवासी शेतकऱ्याच्या (farmer) सोयाबीनच्या (soybeans) गंजीला अज्ञात इसमाने लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) रात्रीच आग लावल्याने शेतकऱ्याची जणू दिवाळीच धगधगली आहे.
गव्हाणीपाडा येथील चिंतामण धोंडू गांगुर्डे या वृद्ध शेतकऱ्याने गव्हाणीपाडा क्षेत्रातील सोनारे शिवारात दोन एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक पेरले होते. पाऊस उघडल्यानंतर पाच-सहा दिवसांपूर्वीच दहा हजार रुपये मजुरी देऊन सोयाबीनची कापणी केली होती. कापलेला सर्व सोयाबीन एकत्र आणून शेतातच गंजी घातली होती. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच उपद्रवी अज्ञाताने डिझेल, पेट्रोल, अगरबत्ती व आगपेटीच्या सहाय्याने गंजीला आग लावली.
गंजीने पेट घेतल्यानंतर मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा आकाशात झेप घेत असताना शिवारात दूरवर शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी फोनवरून पीडित शेतकरी श्री गांगुर्डे यांना रात्री दीड वाजता आगी बद्दल माहिती दिली. एवढ्या रात्री गांगुर्डे कुटुंबीय व इतर गावकऱ्यांनी शिवाराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गंजी खाक झाली होती.
दोन एकरावर पेरलेल्या सोयाबीनच्या गंजीला लागलेल्या आगीत साधारणतः २२ ते २५ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाला. यामुळे सध्याच्या बाजार मूल्यानुसार सव्वा ते दीड लाख रुपयांचा सोयाबीन जळाल्याने शेतकरी चिंतामण गांगुर्डे व त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. मशागत, बियाणे, खते, पेरणी, निंदणी व इतर बाबींवर मोठा खर्च व जळालेला सोयाबीन असे एकत्रित पावणे दोन ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
गंजी पेटविण्यासाठी लढवली शक्कल
उपद्रवी अज्ञात इसमाने सदर शेतकऱ्याची सोयाबीनची गंजी पेटविण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली होती. गंजीपासून थोड्या दूर अंतरावर अगरबत्ती पेटती ठेवत तेथून गंजीपर्यंत कचरा टाकून त्यावर पेट्रोल व डिझेल ओतले होते. अगरबत्तीची ठिणगी कचऱ्यावर ओतलेल्या पेट्रोलवर पडताच गंजीपर्यंत ती आग पोहोचून गंजीने पेट घेतला.
मागच्या वर्षीही असाच उपद्रव करून शेतकरी चिंतामण गांगुर्डे यांना मानसिक छळ देण्याचा प्रयत्न झाला होता. मागील वर्षी उन्हाळी कांद्याच्या रोपावर रातोरात तणनाशकाची फवारणी करत कांदा रोप नष्ट केले होते. त्यामुळे शेतकरी श्री गांगुर्डे यांना वेळेवर कांदा लागवड करता आली नव्हती.
दुसरी गंजी थोडक्यात वाचली
चिंतामण गांगुर्डे यांच्या शेताशेजारीच असलेले सुभाष सोमा गांगुर्डे यांच्या शेतातीलही अडीच एकर क्षेत्रावरील सोयाबीनच्या गंजीला सुद्धा अशाच प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल, विझलेली अगरबत्ती व आगपेटी मिळवून आली आहे. घटनास्थळापासून कोणालाही न दिसता दूर पळून जाता यावे यासाठी ‘टाईम बॉम्ब’ सारखी शक्कल लढवत अज्ञाताने शिंपडलेले पेट्रोल व डिझेल तसेच भरून ठेवलेल्या पेट्रोल व डिझेलच्या बाटल्यांपर्यंत विझलेल्या अगरबत्तीची धग पोहोचू न शकल्याने पुढचा अनर्थ टळला. अन्यथा सुभाष गांगुर्डे यांच्या ३५ ते ४० क्विंटल सोयाबीनची सुद्धा राख रांगोळी झाली असती. तीन महिन्यांपूर्वी सुभाष गांगुर्डे यांची मोटरसायकल व पाच ‘हॉर्स पावर’चा वीजपंप शेतातून चोरीस गेला असल्याची माहिती सुभाष गांगुर्डे यांनी दिली. यावरून उपद्रवी अज्ञात मुद्दाम मानसिक छळ देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याची चर्चा गावात रंगली आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल
सोयाबीनच्या गंजीला मुद्दाम आग लावलेल्या घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस स्टेशनला देण्यात आली. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अ.स.ई. बी. आर. पिंपळे व पोलीस नाईक अतुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सुभाष गांगुर्डे यांच्या गंजीला आग लावण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेले पेट्रोल, डिझेल, अगरबत्ती व आगपेटी असे साहित्य ताब्यात घेतले. सदर घटनेची नोंद घेण्यात आली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असे अ.स.ई. पिंपळे व पोलीस नाईक अतुल पाटील यांनी सांगितले. सदर आकस्मिक घटनेची माहिती तलाठी सूर्यवंशी व कृषी सहाय्यक सीमा सोनवणे यांना देण्यात आली.