अहिल्यानगर (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुक संपताच महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र ही कारवाई येत्या सोमवारपासून आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या आहेत. सोमवारपासून शहराच्या सर्व भागात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने गेल्या आठ दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली आहे. सर्व शहरभर अतिक्रमणांत वाढ झाल्याने ही मोहिम अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा ते चितळे रस्ता, नेता सुभाष चौक, कापड बाजार, मोची गल्ली, बालिकाश्रम रस्ता, उपनगरातील एकविरा चौक प्रोफेसर चौक, भिस्ताबग चौक, सक्कर चौक, मार्केट यार्ड परिसर, बोल्हेगाव, केडगाव, लिंक रस्ता, अंबिका नगर बस स्टॉप, कोठला स्टँड परिसर, झेंडीगेट, मुकुंदनगर, अकबर नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. तसेच, जिल्हा रूग्णालय समोरील गवळीवाडा येथे जनावरे रस्त्यावर सोडली जातात व रस्त्यावर बांधली जात असल्याचे दिसून आले आहे.
आयुक्त डांगे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग अधिकार्यांची बैठक घेऊन सोमवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांची अतिक्रमणे आहेत, त्यांनी ती दोन दिवसात काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिका कठोर कारवाई करेल, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे. अहिल्यानगर शहर अतिक्रमण मुक्त करून शहराची नवी ओळख निर्माण करण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.