Wednesday, October 16, 2024
Homeक्राईमपैशांच्या तगाद्याने महिलेस संपविले ; 20 तासात खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा

पैशांच्या तगाद्याने महिलेस संपविले ; 20 तासात खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा

जळगाव : jalgaon
शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये डोक्यात हातोड्याने वार करून सुवर्णा नवाल (वय 57) यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि.10 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली होती.

दरम्यान, उसनवारी दिलेले पैसे संशयित आरोपींकडे मयत महिलेने वारंवार मागून तगादा लावल्याने एका महिलेसह तिघांनी हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि एलसीबीचे पथक यांनी 20 तासात खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

- Advertisement -

दि.10 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून करण्यात आला होता.पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.

फोन मधील संभाषण तपासले
एलसीबीने मयत सुवर्णा नवाल यांचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यात एका नंबरवर दिवसात सारखे 4 ते 5 वेळा फोन आल्याचे दिसले. त्या दृष्टीने तपासले असता पोलीस संशयित आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (वय 43, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यापर्यंत पोहोचले. तसेच, तपासानुसार आणखी दोघे सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (वय 42, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (वय 58, रा. म्हसावद ता. जळगाव) यांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांना पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

उसनवारीच्या पैशातून वाद
मयत सुवर्णा नवाल यांच्या घरी संशयित सरलाबाई हि काम करायला 2016 सालापासून येत होती. तेव्हापासून त्यांची ओळखी होती. यातून सुवर्णा यांनी सरलाबाई हिला उसनवारी 3 लाख रुपये दिले होते. मात्र सरलाबाईने ते परत केले नाही. तसेच दुसरा संशयित लाला पासवान यालाहि 50 हजार रुपये मयत सुवर्णा यांनी दिले होते. तर लाला हिच्या पत्नीला काही दागिने दिले होते. ते तिने एका सराफाकडे गहाण ठेऊन त्याबदल्यात पैसे काढले होते. आता सुवर्णा नवाल या दोघांकडे पैसे परत मिळावे म्हणून तगादा लावत होत्या. त्यात दोघे टाळाटाळ करीत होते. त्यातच सरलाबाई हिच्या ओळखीचा तिसरा संशयित राजेंद्र उर्फ आप्पा याने अजून पैसे उधार मिळावे म्हणून सुवर्णा हिच्याकडे पैशांची मागणी केली होती. ते देण्यास सुवर्णा नवाल यांनी नकार दिला होता.

पोलीस दलाला यश
खूनाच्या या गुन्ह्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, एमआयडीसीचे पीएसआय दीपक जगदाळे, पीएसआय शरद बागल, किशोर पाटील, गणेश ठाकरे, रामहरी गीते आदींनी ही यशस्वी कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या