Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार आगारातील दोन एसटी कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू

नंदुरबार आगारातील दोन एसटी कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील एसटी महामंडळाच्या आगारात कार्यरत असलेल्या दोन कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. अडीच महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असून एसटी महामंडळाकडून होत असलेल्या जाचक त्रासामुळे दोन्ही संपकरी एसटी कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी मयत कर्मचार्‍यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, मयत कर्मचार्‍यांचा मृतदेह ठोस कारवाई होईपर्यंत उचलणार नसल्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंदुरबार शहर पोलिसांनी तात्काळ नंदुरबार बस स्थानकात पोलीस बंदोबस्त तैनात केला.

- Advertisement -

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. संपकरी विलगीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.

मात्र, संपकरी कर्मचार्‍यांना कामावर रुजू न झाल्यास एसटी महामंडळाकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कारवाईच्या धास्तीने काही कर्मचार्‍यांच्या प्रकृती बिघडली आहे.

दरम्यान, नंदुरबार आगारातील दोन एसटी कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू मंगळवारी दि.१८ जानेवारी २०२२ रोजी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या जाचक कारवाईमुळे दोन्ही एसटी कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचार्‍यांकडून केला जात असून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार आगारातील कंडक्टर युवराज सुका भिल (वय ५२) व चालक अनिल चौरे वाघाळेकर (वय ४५) या दोन कर्मचार्‍यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा मृत्यू एसटी महामंडळाच्या जाचक कारवाईमुळे झाल्याचा आरोप करीत दुखवटा म्हणून नंदुरबार आगारात कर्मचार्‍यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तात्काळ दाखल होत संपकरी कर्मचार्‍यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

परंतु मयत कर्मचारी मृत्यूप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी करत मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन एसटी कर्मचार्‍यांच्या मृत्यूप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या