मुंबई | Mumbai
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच पुन्हा एकदा महायुतीत नाराजीची ठिणगी पेटली आहे. याच नाराजीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी गेलेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात लवकरच नवा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत हे सोमवारी (२० जानेवारी) दावोस येथे पोहोचले. याठिकाणी पोहोचताच त्यांनी एक व्हिडीओ जारी केला, ज्यामध्ये विरोधकांनी केलेले दावे खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले उदय सामंत?
“मी झुरीच विमानतळावर उतरल्यानंतर राज्यात माझ्याबद्दल केलेली विधाने मी ऐकली. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेली विधाने ऐकली. त्यांची विधाने धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यामध्ये मी सहभागी होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रिपद मिळाले असून मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडविण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुणीही वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही.” असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
तसेच विजय वडेट्टीवार यांनीही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. मीदेखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालोय, तुम्हीही सर्वसामान्य कुटुंबातून आला आहात. त्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असताना त्यांना बाजूला करण्याचे षडयंत्र करू नका. तुम्हीही भाजपात येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची किती वेळा भेट घेतली याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. परंतु काही राजकीय पथ्य मी पाळतो. त्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही असे सांगत मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले.
एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कुणी करू नये. जे विधान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले ते धादांत खोटे आहे. या विधानाचा मी निषेध करतो. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो आणि भविष्यात ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. त्यामुळे अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही. यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमजही होणार नाहीत असा टोला मंत्री सामंत यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा