नागपूर | Nagpur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी (१५ डिसेंबर) विस्तार झाला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज असून त्यांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत व छगन भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत. त्यातच अद्याप खातेवाटप झाले नसून येत्या एक दोन दिवसात खाते वाटप होईल अशी माहिती पुढे आली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ही मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे यांनी हिवाळी अधिवेशन सोडून रवाना झाले आहे. यावर आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदय सामंत
सामंत म्हणाले, “आमचे ५७ आमदार आहेत आणि ११, १२ मंत्रिपदे आम्हाला मिळाली आहेत. अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचे आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो”. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. आम्ही मंत्री असल्याने ज्यांची नाराजी असेल ती दूर करण्याचं काम करू. आम्ही अनेकांशी चर्चा केली आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे हे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी एकनाथ शिंदे बोलून घेतील आणि समजूत काढतील. आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र होते, १२ मंत्री बनवताना नेत्याचाही निकष लागतो. मी जर चांगले काम केले नाही तर ज्या नेत्याने आम्हाला मंत्रिपद दिले ते २-३ महिन्यात काढूनही घेऊ शकतात ही भीती आमच्या मनात आहे. त्यामुळे आम्हालाही शिवसेना आमदार, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करावे लागतील असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
“एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळाले नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसेच जे मंत्री झालेत त्यांच्यामध्ये कोणाची काही नाराजी असेल तर ती देखील दूर करणे आवश्यक आहे. आम्ही शिवसेना म्हणून विस्ताराने त्यावर काम करत आहोत. शिवसेनेत यावर चर्चा होत आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे ही शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी आहे. दोघेही मंत्री होते, त्यांना लवकरात लवकर आमचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री बोलावून घेतील आणि त्यांची समजूत काढतील. परंतु, तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात आहे ते या दोघांच्या मनात नसेल, याची मी सर्वांना खात्री देतो”.
मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू. आम्ही १२ मंत्री म्हणजे ६० आमदार मंत्री असल्यासारखेच आहेत. आम्ही कुठेही आमदारांवर अन्याय होऊ देणार नाही. ६० आमदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे. मंत्री कुणाला करायचे की नाही याला बंधने आहेत. ४३ मंत्री आम्हाला करायचे होते. तिन्हीही नेत्यांनी विचार करून मंत्रिपद वाटप केले असेल त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्यांना मिळाली नाही तेदेखील तेवढेच सक्षम होते. आमच्या पक्षातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे मिळायला हवी होती. परंतु ४३ पैकी १२ मंत्रिपदे शिवसेनेला मिळाली आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आमदारांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचा आहे ते आम्ही करू असं त्यांनी सांगितले.