नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यस्तरीय पक्ष असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशपातळीवरील प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत होते. समान नागरी कायदा, राममंदिर अगदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भाषण झाले तरी त्यासंदर्भात ते स्पष्ट भूमिका मांडत होते. मात्र उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाही व निर्णयदेखील घेत नसल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केली.
उपसभापती गोर्हे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतके दिवस काम केल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विचार केला. समान नागरी कायदा, राममंदिर या प्रकारचे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने घेतले आहेत. त्याचबरोबर राज्यात चांगल्या पद्धतीने सरकार चालवले जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जात असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीगड व नाशिकला धार्मिक पर्यटनासाठी निधी मिळावा, यासाठी आपले प्रयत्न आहेत. आपत्ती, पुनर्वसन, रस्ते अपघात, महिला सुरक्षा, महिला धोरण यावर मी पुढे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांच्यासोबत मी पुणे येथे मोठे काम केले आहे. त्यांच्या कामाचा मला अनुभव आहे. ते धडाडीने काम करतात. त्याचा राज्यातील जनतेला व सत्ताधारी पक्षांना फायदा होईल. कायद्याने शिवसेना शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. माझ्यावर अविश्वास ठराव आणला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याला अर्थ नाही.
कुठल्याही पदासाठी किंवा स्थान टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला नाही. शिंदे योग्य मार्गावर असल्याने त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका घेतली. शिवसैनिक म्हणून व त्यातही महिला म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी चांगली संधी दिली. मात्र उद्धव ठाकरे भूमिका मांडत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भूमिका मांडत होते अगदी लाल किल्ल्यावर झालेल्या भाषणाचा उल्लेख करत ते स्वतःची व पक्षाची भूमिका जाहीर करत होते. मात्र सध्या उद्धव ठाकरे भूमिका मांडण्यात कमी पडतात, अशी टीका त्यांनी केली.