मुंबई । Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि.19) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्यासाठी साद घातली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांनी युतीसाठी काही स्पष्ट अटी मांडल्या आहेत.
“मी देखील मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. राज ठाकरेंच्या वक्तव्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी एक अट आहे. महाराष्ट्राच्या हितास आड येणाऱ्यांचं समर्थन मी करणार नाही. त्यांच्या घरी जाणार नाही, त्यांना घरी बोलवणार नाही, त्यांच्या पंगतीला बसणार नाही. हे आधी ठरलं पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो की, राज्यातून उद्योग गुजरातला जात आहेत. त्यावेळी विरोध केला असता, तर आज केंद्रात महाराष्ट्राच्या हिताचं सरकार असतं. पण तेव्हा पाठिंबा दिला आणि आता विरोध करत आहेत. याला तडजोड म्हणता येणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला एकत्र येण्याचं आवाहन करताना म्हटलं, “आज ठरवा की भाजपसोबत जायचं की माझ्यासोबत. मी गद्दार नाही, माझी शिवसेना खरी आहे.”
“हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताचं निर्णय घ्या. विरोध करायचा की निस्वार्थ पाठिंबा द्यायचा हे ठरवा. महाराष्ट्राचं हित हाच एकमेव निकष आहे. चोरांना पाठिंबा न देता, छुप्या भेटी न घेता आणि प्रचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्या,” असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं.