मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांवर भाष्य केले आहे. याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. मी सल्ला देतो आहे टोमणा मारत नाही त्यांनी ऐकायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
किती काळ हे सहन करायचे, आमची चूक काय?
मराठी माणसाचे एक वैशिष्ट्य आहे. मराठी माणूस आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मी भला माझे काम भले, असा मराठी माणूस आहे. मराठी माणूस कोणावर अन्याय करत नाही. परंतु, अन्याय झाला, तर तो सहन न करणारा मराठी माणूस आहे. शेवटी सहनशीलतेचा कडेलोड व्हायला लागला. तेव्हा मराठी माणूस पिसाळला आहे. जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी पेटला होता. किती काळ हे सहन करायचे, आमची चूक काय. मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे. हिंदी सक्तीच्या निमित्ताने भाजप महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसे घडणार नाही. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून टीका केली.
माझं मत आहे सल्ला आहे टोमणा नाही
महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होते का? असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, “नाही, चर्चा फार होत नाहीत. सुरुवातीला जाऊन मी त्यांना गुच्छ दिला होता. आहेत ते मुख्यमंत्री, मानो या मानो. तुमच्याकडून चांगले व्हावे अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. उलट आत्ता जे काही त्यांच्या सहकारी मंत्र्याच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढावीत. आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो आहे, हे माझे मत टोमणा म्हणून नाही, तर सल्ला म्हणून घ्यावे. जर देवेंद्र फडणवीस हे नीती वगैरे सगळ्या गोष्टी मानत असतील तर त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे हे काम आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे धक्काबुक्की होते आहे, कुठे तीन हजार कोटींची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते आहे, या सगळ्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे.”
आम्ही चोरूनमारुन भेटणाऱ्यातले नाही
मुंबईच्या, मराठी माणसाच्या लढ्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात राज ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. “मी जर थेट चर्चा केली तर कुणाला काय अडचण आहे? मी आतासुद्धा फोन उचलून त्याला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो, आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक एकमेकांना चोरूनमारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणाऱ्यातले नाहीत. मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललात ना की ‘ठाकरे ब्रॅण्ड’ वेगळा आहे. ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला? असा सवाल ठाकरेंनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





