नाशिक | प्रतिनिधी
स्वच्छता ही खरोखर सेवाच असून प्रत्येकाने स्वतपासून संपूर्ण स्वच्छतेचा संकल्प केल्यास प्रत्येक गाव व शहर स्वच्छ व सुंदर होणार आहे. स्वच्छतेच्या चळवळीत लोकसहभाग अतिशय महत्वाचा घटक असून स्वच्छता अभियानात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
स्वचछ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत असून आज जिल्हयात सर्व ठिकाणी श्रमदान मोहिम राबवून सेवा दिवस साजरा करण्यात आला. नाशिक तालुक्यातील गोवर्धन ग्रामंपचायतीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत श्रमदान मोहिम राबविण्यात आली.
यावेळी मित्तल यांनी प्रत्येकाने स्वच्छतेचा संकल्प केल्यास व स्वच्छतेची सवय लावून घेतल्यास गाव स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार असून सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शालेय स्तरावर देखील याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्योनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती देताना कचरामुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन दत्त मंदिर परिसर तसेच गोदावरी नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी सोनिया नाकोडा, सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गाडे, दत्तु डंबाळे, गोविंद बेंडकुळे, बापू डंबाळे, नंदा वायचळे, रत्ना मधे, लंकाबाई बदादे, ग्रामसेवक प्रकाश खैरनार, माजी सरपंच प्रल्हाद जाधव, विस्तार अधिकारी सोनवणे उपस्थित होते.