Saturday, July 27, 2024
Homeनाशिककोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या: डॉ. भारती पवार

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या: डॉ. भारती पवार

नाशिक | प्रतिनिधी

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे राज्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले असून पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिति ओढवली असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना निवेदन दिले.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने १२२ वर्षातील कोरडा ऑगस्ट ठरला आहे. पाऊस नसल्याने शेतकरीही चिंतातूर झाला आहे तर, धरणातही पाणीसाठा नाहीये.

विक्रमी पाऊस असणार्‍या सुरगाणा व पश्चिम पट्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पश्चिम वाहिनी नदीवरील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे परिणामी धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खो-यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याचा पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

या वर्षी खरीप पेरणीसाठी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. परंतु पडलेल्या अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही अशी एकवेळ अवस्था होती. परंतु कसेबसे पेरलेले उगवले व सर्वच पिके जोमात असताना पुन्हा पावसाने ओढ दिल्याने मागील ३० दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला.

शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु पुरेसा पाऊस झाला नसल्याने पुन्हा दुबार पेरणीच संकट ओढवले आहे. परिणामी शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळाची भीषणता जाणवू लागली असून कर्जाने पैसे घेवून शेतकर्‍यानी मशागत करून पेरणी केली मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून मका, ऊस, द्राक्षबागा,फळबागा,बाजरी, ज्वारी, भूईमुग, कांदा यांच्यासह खरीपातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून अर्थातच खरीप हंगाम हातचा गेला आहे.

अनेक ठिकाणी जनावरांच्या चार्‍याचीही टंचाई जानवू लागली आहे. याचा मोठा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होणार असून शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडणार नाही. यामुळे शेतकर्‍यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार असून बळीराजा आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा असे निवेदनात म्हटले आहे. नाशिक जिल्हा दुष्काळी जाहिर करा _किसान सभा मागण किसन सभेनेहीवरील प्रश्नावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिले. नाशिक जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहिर करावा. कांदा निर्यात शुल्क रद्द करा. अशी मागणी किसान सभा नाशिक जिल्हा वतीने करण्यात आले

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्के लादली आहे त्वरित रद्द करावी अन्यथा किसान सभा तीव्र आंदोलन करेल. तसेच नाशिक जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी याची दखल घेऊन नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.

तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज ची मदत करून शेतकरी व ठेवीदारांना दिलासा द्यावा तसेच वनजमीन व गायरान जमीन धारक कसत असलेला जमिनीवर घरी नावावर करण्यात यावी. शी मागणी राजू देसल, भास्करराव शिंदे , नामदेव बोराड, मधुकर मुठाळ, जगन माळी, सोहम शिरसाठ, शरद पवार,निवृत्ती कसबे, महादेव खुडे , विठ्ठल घुले आदिंनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या