कोल्हापूर | Kolhapur
वैष्णवी हगवणे यांचा छळ आणि मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणात फरार असलेले संशयित राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटूंबियांबद्दल नव नवे खुलासे होत असून विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधायला सुरवात केली आहे. ज्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांमुळंही अनेक चर्चांना उधाण आले. याचसंदर्भात आता खुद्द अजित पवार यांनीच आपली बाजू स्पष्ट शब्दात आणि जाहीरपणे माध्यमांसमोर मांडली आहे.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मुलीच्या लग्नात ५१ तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार भेट दिली होती. या शाही लग्न सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहिले होते. या लग्न सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन अजित पवार संतापले आहेत. यावरुन आता त्यांनी आपली भुमिका मांडली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
”मी लग्नाला गेलो. माझा फोटो काढला. त्यात माझा काय दोष? माझ्यावर असे आरोप होत असतील तर मी लग्नाला जाणार नाही. माझा दोष नसताना मला का दोषी धरताय?. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. तो केवळ पक्षाचा कार्यकर्ता होता. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कस्पटे कुटुंबियांच्या बाबतीत दुःखद घटना घडली. मी आज संध्याकाळी कस्पटे कुटुंबियांची भेट घेणार आहे.” असे अजित पवार बोलताना म्हणाले.
सदर प्रकरणातील तपासाविषयी माहिती देताना हगवणे कुटुंब कुठेही असतील तर त्यांना पकडण्याचे निर्देश देण्यात आले होते असे सांगताना तीन टीम त्यांना पकडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, त्या दुप्पट करण्याच्याही सूचना आपण दिल्या होत्या असे अजित पवार म्हणाले.
हगवणेंच्या आणखी एका सुनेकडूनही चौकशी करत नेमके काय घडत होते हे विचारण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्याचे पवारांनी सांगितले. फोनवरून सर्वकाही बोलता आले नसल्याने प्रत्यक्षात भेटून कस्पटे कुटुबीयांशी या घटनेवर सविस्तर माहिती घेतली जाईल म्हणत, ‘मी किंवा मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या असून अशा प्रकारच्या घटना घडल्याच नाही पाहिजे यासाठीच यंत्रणा काम करत आहेत’, असा विश्वास त्यांनी दिला.
लग्न करु पाहणाऱ्या सर्वच मुलींना उद्देशून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळकळीची विनंतीसुद्धा केली. ‘माझे सगळ्या मुलींना आवाहन आहे. ज्या वधू म्हणून कोणत्या कुटुंबात जातात, त्यांना एकच सांगणे आहे की जरासाही त्यांना संशय आला आणि तक्रार केली तर ताबडतोब तिथे कारवाई करता येऊ शकते. अशाने इथपर्यंतची वेळ तुमच्यामाझ्या घरातल्या मुलींवर येणार नाही’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाला कस्पटे कुटुंबियांकडे देण्यात आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन- तीन दिवस आई नसल्याने बाळ रडत होते. काल ते आजीच्या कुशीत झोपले. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवले. पण तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. यामुळे सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली. पण राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे फरार होते. त्यांनाही आता अटक करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा