मुंबई | Mumbai
ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रात्री निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. ‘अगंबाई सासूबाई’ ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली. १९४४ मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष हे बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या ८२ व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.
बबड्याचे आजोबा
अलीकडेच ते ‘बबड्याचे आजोबा’ म्हणून पुन्हा एकदा घराघरात पोहोचले होते. एक तापट पण तितकेच प्रेमळ अशी आजोबा ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ ही भूमिका त्यांनी साकारली. यावेळी निवेदिता सराफ यांच्या सासऱ्याची भूमिका रवी पटवर्धन यांनी साकारली होती. सासरे आणि सून या नात्यातील एक वेगळा पैलू या भूमिकेतून त्यांनी मांडला. कोरोना काळातील ज्येष्ठ नागरिकांना काम करण्याची परवानगी नसल्याने त्यांना या मालिकेत पुन्हा पाहता आलं नाही. काही वेळा ते व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून या मालिकेत दिसले होते.
रिझर्व्ह बँकेत नोकरी
रवी पटवर्धन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर ते, रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाण्याच्या घरात राहत होते, याच घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना, मुलगी, जावई, 4 नातवंड असा परिवार आहे.