मुंबई । Mumbai
औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याट यावी या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरात आंदोलन होत आहे. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आला होता.
मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाला असून शहरातील महाल भागात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. या राड्यात पोलिसांवर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली तसेच खाजगी मालमत्तेला नुकसान पोहचवण्यात आला. तर दुसरीकडे या प्रकरणावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. आज माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
वडेट्टीवार बोलताना म्हणाले, नागपुरात झालेली घटना दुर्दैवी आहे. दोन समाजामध्ये तणाव आणि दगडफेक झाली. नागपूर सारख्या शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण? शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचे काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे.
तसेच, गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण करेल असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. कबरीचा वाद जाणूनबुजून निर्माण करण्यात आला. इतिहास तोडून मोडून पुढे आणण्याचे काम केलं गेलं. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीच्या प्रश्नातून काय साध्य होणार आहे. ती कबर ठेवली काय आणि नाही त्यामध्ये कुणाचा फायदा होणार आहे. यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.