Tuesday, October 22, 2024
Homeनगरस्वाभिमानी जनताच विरोधकांना योग्य उत्तर देईल - विवेक कोल्हे

स्वाभिमानी जनताच विरोधकांना योग्य उत्तर देईल – विवेक कोल्हे

काळे यांची अवस्था चावी दिलेल्या बाहुल्यासारखी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

उर्ध्व गोदावरी खोरे अगोदरच तुटीचे आहे. वाढत्या शहरीकरणा बरोबरच दारणा गंगापूर धरण समूहात बिगरसिंचन पाण्याचे आरक्षण वाढत असताना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात पाण्यासाठी संघर्ष करून बारमाही गोदावरी कालव्यांना पाणी मिळविले. सोनेवाडी परिसरात एमआयडीसी होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले व एमआयडीसी मंजूर करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेतली.त्याचे पाण्याचे धोरण आखून पुढील काम अपेक्षित होते. सध्या दारणा समुहावर पाण्याचे नियोजन व धोरण न पाहिल्याने व अभ्यास नसल्याने त्यांंना ते करता आले नाही. परिणामी गोदावरी उजव्या कालव्यावरील शेतीच्या पाण्याचे नियोजन ढासळले जाईल व गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांना त्याची झळ बसणार आहे.

- Advertisement -

यामुळे आपल्याकडे शेती पाण्याची तूट होवून आवर्तन कमी होण्याचा धोका वाढला आहे. शेजारच्या येवला तालुक्यातील 40 गावांच्या पिण्यांच्या पाण्याचेही 2.68 दलघमी आरक्षण दारणेवरच टाकले तेंव्हाही आमदार गप्पच राहिले, विरोधक सध्या असत्याची चादर पांघरून बसले आहे ती फाडून सत्याचा उजेड पाडण्याचा संकल्प करू व योग्य वेळी समाचार घेवुन सत्य उजेडात आणु. मात्र आपल्या आमदारांनी या आरक्षणावर विधीमंडळात चकार शब्द काढला नाही, तेंव्हा या शेती उद्ध्वस्त करणार्‍या आमदारांचा आपण निषेध करतो, अशा शब्दात युवानेते विवेक कोल्हे यांनी विरोधकांनी केलेल्या टिकेचा खरपुस समाचार घेतला.

विजयादशमीनिमित्त संवाद साधताना विवेक कोल्हे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यात आळंदी, वाघाड, पालखेड, काश्यपी, गौतमी, वालदेवी, मुकणे, भाम, मुकणे उंचीवाढ, निळवंडे, भावली, वाकी धरणे बांधुन शेती सिंचनाबरोबरच औद्योगिकीकरणालाही पाणी मिळविले. पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामाला मंजुरी मिळवत मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत त्याचे कामही सुरू झाले आहे ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत आहेत, उलट त्यांच्याच कामाचा हिशोब ते मागत आहे हे बरोबर नाही.

संजीवनी नोकरी महोत्सवमुळे धडकी विरोधकांना बसली आहे, तालुक्याची स्मार्टसिटी विरोधकांनीच घालवली तरीही ते आमच्यावर व्यक्तीद्वेषातुन उठसुठ टिका करत आहेत, आमच्यावर टिका केल्याशिवाय त्यांना काहीच साध्य होत नाही. आमदार असताना अशोकराव काळे यांनी घेतलेले निर्णय व धोरण मतदारसंघ मागे नेणारे होते तीच पुनरावृत्ती विद्यमान आमदारांनी केली आहे.चावी दिलेल्या बाहुल्यासारखे आमदार काळे हे स्वतःच्या कृतीने वागत नाही तर त्यांना एजंसी चालवते अशी बोचरी टीका कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या