राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
तालुक्यातील वाकडी भागात चार बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. बिबट्यांनीवाकडी च्या लबडे वस्ती भागातील सर्व कुत्रे फस्त केले असून एकही कुत्रे ठेवले नाही. वाकडी भागात बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसांपासून आहे. वाकडी परिसर ऊस, फळबागा, चारा पिके, व अन्य पिकांनी बहरलेला आहे. त्या भागात बिबट्यांना लपण असल्याने ते त्या भागात मुक्तपणे राहातात. आपली उपजिविका करण्यासाठी हे बिबट्यांनी अनेक वस्त्यांवरील कुत्रे तसेच शेळ्याही फस्त केल्या आहेत. रात्री हे बिबटे मुक्तपणे वस्त्यांवर सावज शोधत फिरतांना दिसतात.
काही वस्त्यांवर सिसी टिव्ही कॅमेरे असल्याने कुत्र्यांवरील हल्ले स्पष्टपणे हे कॅमेरे टिपतात. शेळ्या फस्त केल्या तर वनविभागाचे कर्मचारी येवून पंचनामा करतात. त्या भागात पिंजरेही लावले. मध्यंतरी बिबट्या जेरबंदही केला परंतू अजुनही वाकडी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. यामुळे वाकडी भागातील रहिवाशी तसेच शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. हे बिबटे कंबरे एवढ्या उंचीचे झाले आहेत. वाकडीच्या लबडे वस्ती भागात दोन बिबट्यांचा वावर सततचा आहे. या बिबट्यांनी लबडे वस्ती भागातील सर्वच कुत्रे फस्त केले आहेत. गावठी कुंत्र्यांसह भाऊसाहेब लबडे यांचे लॅबरेडॉन जातीचे मोठे कुत्रेही फस्त केले. भटक्या कुत्र्यांचा वावरही या वस्तीवर आता दुर्मिळ झाला आहे.
गोरे वस्ती भागातही दोन बिबट्यांचा वावर आहे. त्या भागातील शेळ्या तसेच कुत्रेही बिबट्यांनी फस्त केले. त्यामुळे आदलून बदलून अनेकांच्या पाळीव प्राण्यांवर गंडांतर या बिबट्यांच्यामुळे येत आहे. वाकडी परिसरातील धनगरवाडी येथे एका मुलीचा तसेच चितळी परिसरात एका मुलावर हल्ला करुन बिबट्यांनी या दोन्ही चिमुरड्यांना ठार केले. तेंव्हा पासून वाकडी, धनगरवाडी तसेच काकडाई मंदिर परिसर, चितळी परिसरात बिबट्यांची मोठी दहशत आहे. या बिबट्यांना वनविभागाने जेरबंद करणे गरजेचे आहे.
लबडे वस्ती तसेच गोरे वस्ती भागात पिंजरे लावले तर हे बिबटे अलगद पिंजर्यात अडकतील. वनविभागाने तसेच ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वाकडी भागातील ज्या ज्या ग्रामपंचायती असतील त्यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.यासाठी वनविभागाला पिंजरा लावण्याचा आग्रह धरुन या बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी वाकडी येथील भाऊसाहेब लबडे यांनी केली आहे.