नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
वक्फ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केले जाईल. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप देखील जारी केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वक्फ विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ राखून ठेवला आहे.
भाजपच्या वतीने या विधेयकावर सात सदस्य चर्चा करतील, त्यात रवीशंकर प्रसाद, जगदंबिका पाल, अनुराग ठाकूर, अभिजित गंगोपाध्याय, निशिकांत दुबे, कमलजीत सहरावत, तेजस्वी सूर्या यांचा समावेश आहे. जेव्हा व्यवसाय सल्लागार समितीने ही माहिती दिली तेव्हा विरोधकांनी निश्चित वेळेला विरोध केला आणि १२ तासांची चर्चा करण्याची मागणी केली. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, विधेयकावर चर्चेसाठी वेळ वाढवला जाऊ शकतो.
दरम्यान, भाजपने जारी केलेल्या व्हिपमध्ये म्हटले आहे की, बुधवारी सभागृहात अत्यंत महत्वाचे कायदेविषयक काम आहे. ते मंजूर करण्यासाठी सर्वांनी पक्षाला समर्थन द्यावे आणि मतदान करावे. भाजपचे लोकसभेत २४० खासदार आहेत. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे लोकसभेत २९३ सदस्य आहेत. ही संख्या, विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७२ या मॅजिक फिगरच्या तुलनेत अधिक आहे. एकीकडे एनडीएतील घटक पक्ष टीडीपीने उघडपणे या विधेयकाला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जेडीयूनेही विधेयकाला फारसा विरोध केला नाही.
भाजपने विरोधी पक्षातील अनेक पक्षांसोबत बैठक घेत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कदाचित विरोधी पक्षातील काही पक्ष वक्फ विधेयकावरून सत्ताधारी भाजपसोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र असे असले तरी, सरकार जेडीयू आणि टीडीपीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत, या विधेयकासंदर्भात कोणता पक्ष काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फडणवीसांचा ठाकरेंना चिमटा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला खोचक टोला मारत आपल्या एक्सवर एक पोस्ट केली आहे. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? अशी विचारणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील ठाकरेसेनेला चिमटा काढला आहे.
विरोधकांचा गदारोळ
वक्फ दुरुस्ती विधेयकावरून काल लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, त्यानंतर कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
लोकशाही भारताच्या इतिहासात जेपीसीने सर्वात व्यापक सल्लामसलत प्रक्रिया आणि सर्वोच्च प्रतिनिधित्वाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता हे वक्फ विधेयक तयार झाले आहे, मी सर्व राजकीय पक्षांना त्यात सहभागी होण्याची आणि संसदेत त्यांचे विचार मांडण्याची विनंती करू इच्छितो. कृपया लोकांची दिशाभूल करू नका. चर्चेत सहभागी व्हा.
- किरेन रिजिजू, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री