नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील कश्यपी धरणात शिल्लक असलेल्या ६८ टक्के साठ्यातून (दि.१६) सकाळी पाणी सोडण्यात आले.
दरम्यान यंदाचे हे पहिले आवर्तन असून बोगद्यातून वेगाने येणाऱ्या पाण्याला उसळत्या धबधब्याचे स्वरूप आले आहे. गेल्या अनेक दिवस कोरडीठाक पडलेली कश्यपी नदी ही खळाळून वाहू लागली आहे.
यंदा गंगापूर धरणाला आता पर्यंत ५५ टक्केच साठा शिल्लक आहे तर कश्यपी धरणात ६५ टक्केहून अधिक पाणी साठा शिल्लक आहे. त्यातून आता ४५० क्यूसेस पाणी सोडले जात आहे, अशी माहिती स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
कश्यपी धरणातून पाणी सोडताना धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राखीव ठेवावा या मागणीसाठी धरणग्रस्त व स्थानिक धोंडेगाव, खाड्याची वाडी, गाळोशी, देवरगाव, शेरपाडा गावाने पाटबंधारे खात्याकडे केली आहे.
दरम्यान कश्यपी धरणातील पाणी सोडल्याने गंगापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे.
कश्यपी धरणासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असून त्याचा फायदा स्थानिकांपेक्षा पूर्वेकडील शेती व नाशिक, नगरला होत आहे. त्यामुळे निदान ३० टक्के पाणी स्थानिक शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावे. तसेच येथील गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त ठेवावा अशी आमची मागणी आहे.
– हिरामण बेंडकोळी, नागरिक