Saturday, July 27, 2024
Homeनगरजलसंपदा कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जलसंपदा कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

तीन महिन्यापूर्वी निळवंडे धरणाच्या कालव्याची चाचणी घेण्यात आली. मात्र या चाचणीनंतर पुन्हा पाणी सोडण्याचे कोणतेच नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेले नाही. तात्काळ कालव्याला पाणी सोडावे या मागणीसाठी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्यावतीने दि. 13 सप्टेंबरला संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी दिली.

- Advertisement -

यावर्षी दुष्काळाचे तीव्र सावट निर्माण झाले आहे. दुष्काळी भागातील सर्वच पाझर तलाव भरून द्यावेत यासह उजव्या कालव्याचे काम तात्काळ पूर्ण करणे. ओढ्यांवर एस्कॅप काढणे, निळवंडेचे पाणी लाभक्षेत्र सोडून इतरत्र सोडू नये, उन्हाळ्यात लाभक्षेत्रात पाणी राखीव ठेवावे. चार्‍यांच्या कामांबाबत जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, चार्‍यांच्या कामांची तात्काळ निविदा काढणे. कालवा अस्तरीकरण एकाच ठेकेदाराला न देता अनेक ठेकेदारांना विभागून द्यावे, ज्यामुळे अस्तरीकरणाच्या कामाला गती येईल आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निळवंडे पाटपाणी कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यासंबंधीच्या मागण्याचे निवेदन जलसंपदा कार्यालयाला देण्यात आले आहे. या निवेदनावर नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, दत्ता भालेराव, सुखलाल गांगवे, जालिंदर कांडेकर, चंद्रभान गुंजाळ, प्रल्हाद गागरे, दिनकर लोंढे, मधुकर घोरपडे, भीमाशंकर सोनवणे, नामदेव डांगे, अण्णासाहेब गांगवे आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या