इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri
इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, स्थानिक आदिवासी महिलांना अक्षरशः जीव धोक्यात घालून दोनशे फूट खाली उतरून झर्यातून पाणी भरावे लागत आहे.
परिसरातील पाझर तलाव पूर्णपणे आटले असून, एकमेव झरा उरलेला असून जो तलावाच्या एका कोपर्यात पाझरत आहे. या झिर्यातून एक हंडा पाणी भरायला सुमारे 20 मिनिटे लागतात. मात्र, पाणी भरून एवढ्यावरच महिलांचा त्रास संपत नाही. त्यानंतर त्यांना खडकाळ, अरूंद व दोनशे फूट उंच चढणार्या पायवाटेने टेकडी चढत 1 ते 1.5 कि.मी. अंतरावर पाणी वाहून न्यावे लागत आहे. हा प्रवास अत्यंत कष्टदायक, धोकादायक आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा महिला पाणी वाहून नेत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून अद्यापही योग्य उपाययोजना करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे गावात जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी नियोजनाच्या अभावामुळे त्या टाकीत अद्याप पाणीच आलेले नाही. परिणामी ही योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहे. या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः महिलांना दररोजच्या जीवनात अत्यंत त्रास सहन करावा लागत असून, आरोग्य व सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गावकर्यांनी प्रशासनाकडे तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याची आणि जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.