मुंबई | Mumbai
रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शहर आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस असून शहरातील विविध भागात पाणी साचले आहे. पावसाचा जोर इतका आहे की रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने मुंबईतील पावसाबाबत अपडेट दिली असून पुढील तीन तास मुंबईकरांसाठी महत्वाचे असणार आहे. काही काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सुचना हवामान खात्याने नागरिकांना दिल्या आहे.
हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून यासंदर्भातील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे.
दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, दादर, फाईव्ह गार्डन, स्वामीनारायण मंदिर, जे.जे. फ्लायओव्हर आणि माटुंगा येथील सखल भागांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले आहे. अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झालेले आहे.
लोकल सेवेवर परिणाम
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन सेवांना पावसामुळे मोठा फटका बसला आहे. सेंट्रल आणि हार्बर लाईनवर विलंब होत असून चुनाभट्टी स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने काही काळ हार्बर सेवा विस्कळीत झाली होती. वडाळा येथे मोनोरेल तांत्रिक कारणाने बंद पडल्याने १७ प्रवासी अडकले होते. ज्यांना प्रशासनाने सुरक्षित बाहेर काढले. तसेच पश्चिम मार्गावरील दादर वांद्रे स्थानकातही पाणी साचल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.
पुण्यात ही मुसळधार पाऊस
पुण्यात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. १५ सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात १५० नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे ५५ नागरिकांना सुरक्षित हलविले.
महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संपूर्ण कोकण पट्ट्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याठिकाणी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




