Friday, June 28, 2024
Homeनगरविहिरीत पडलेला बिबट्याने वर येताच तुटक्या पिंजर्‍यातून ठोकली धूम

विहिरीत पडलेला बिबट्याने वर येताच तुटक्या पिंजर्‍यातून ठोकली धूम

वनविभागाची बेपर्वाई

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घनगाव वस्ती आंबेडकरनगर येथे गौतम हरी घनघाव यांच्या विहिरीत बिबट्या पडलेला आढळुन आला. गावकर्‍यांनी वनविभागाच्या मदतीने वर काढला. पण ज्या पिंजर्‍यातून हा बिबट्या वर काढला तो खराब असल्याने त्या पिंजर्‍याच्या फळ्या तोडुन त्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. या ठिकाणी उपस्थितांचा मात्र यावेळी काळजाचा ठोका चुकला. वनविभागाच्या बेपर्वाईमुळे ही घटना घडली.

गौतम घनघाव हे आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता गेले होते. परंतू विहिरीतून पाणी येत नाही म्हणून ते विहिरीत डोकावले असता विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. बिबट्या पाहुन गौतम घनघाव घाबरून गेले. त्यांनी आसपासच्या नागरिकांना कळविले. नागरिकांनी वनविभागाला फोन केला. तोपर्यंत सुरेश घनघाव, अनिल घनघाव, अमोल घनघाव यांनी बिबट्या पाण्यात गदमरु नये म्हणून पाण्यात बाज टाकली. दुपारी वनविभागाच्या पथकाने हा बिबट्या विहिरीत पिंजरा सोडून त्यातून वर काढला.

बिबट्या वर काढताच पिंजर्‍याचा तळाचा लाकडी भाग कुजलेला व खराब असल्याने लाकडाच्या भागात गॅप पडला. यातून तो बिबट्या उडी मारून पसार झाला. रत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या खराब पिंजर्‍याला जबाबदार कोण, कोणाचा बळी गेला असता तर यास कोण जबाबदार आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. यावेळी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यामुळे गौतम घनघाव यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या