Saturday, July 27, 2024
Homeनगरपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार - मुख्यमंत्री शिंदे

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री शिंदे

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

गोदावरी खोर्‍याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

- Advertisement -

शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे शासन आपल्या दारी या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनाच्ंया लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. किरण लहामटे, आ. प्रा. राम शिंदे, आ. आशुतोष काळे, आ. सत्यजित तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे पाटील, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते उपस्थित होते.

शासन आपल्या दारी अभियानात अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी 30 हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री शिदे म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 1 कोटी 40 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.

जिल्ह्यात लाभार्थ्यांना 3 हजार 982 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. 53 वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने 35 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून 24 लाख लाभार्थ्यांपर्यंत शासन पोहचले असून 3 हजार 900 कोटी रुपयांचा लाभ एकट्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाला आहे. नमो शेतकरी सन्माननिधीत आता शेतकर्‍यांना वर्षाला 12 हजारांची मदत मिळत आहे. जिल्ह्यात फक्त एक रूपयात 12 लाख शेतकर्‍यांचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. राज्यात दुर्दैवाने दुष्काळ आला तर यावेळी सर्वच शेतकर्‍यांनी विमा उतरवलेला आहे. त्यामुळे सरकारची मदत, विम्याची मदत असेल या सगळ्या गोष्टी शेतकर्‍यांपर्यंत शासन पोहचविणार असून सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांना वर्षभर दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये नगर जिल्ह्याने आघाडी घेतली असून कदाचित अहमदनगर जिल्हा पूर्णपणे सोलर जिल्हा होणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील सहकारी चळवळीला आर्थिक मदत व गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या धोरणामुळे मिळाले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यात साखर कारखान्यांना मोठे बळ मिळाले आहे. साखर कारखान्यांनी आता नुसते साखर उत्पादन न करता इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग लवकरच सुरू होणार आहे. नागपूर-शिर्डी तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंत समृध्दी महामार्गाची वाहतूक ही सुरू झाली आहे. अशा प्रकारे या परिसराचा चौफेर विकास होत आहे.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, एक रुपयात शेतकर्‍यांना विमा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, ही अभिमानाची बाब आहे. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत 170 कोटी रूपये खर्च केले आहेत. लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लम्पी आजारासाठी लागणार्‍या मदतीसाठी शासन सदैव शेतकर्‍यांशी पाठीशी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात येणार्‍या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले असून त्यांचे संगोपन करावे. असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रातिनिधिक स्वरूपात 25 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये बबनराव गोविंदराव कबाडी (पुणतांबा) वैभव चंद्रकांत कांबळे (चिखलनवाडी, ता. नेवासा) सौरभ दादासाहेब दौले (नेवासा) जया भास्कर पालवे (सावेडी, अहमदनगर) प्रफुल्ल भाऊसाहेब साळवे (राहुरी), हिराबाई ज्ञानदेव हळनूर, (पुरंपूर ता. श्रीरामपूर), बाळासाहेब नानासाहेब गव्हाणे (रांजणगाव देशमुख), सुधाकर घोरपडे (मुंगी ता. शेवगाव), पद्मा रोहिदास माळी, (कोपरगाव), भारती दीपक वाडेकर (संगमनेर), संजय नानाभाऊ कडूस (सारोळा ता. अहमदनगर), सीमा शब्बीर इनामदार (लोणी), मुक्ता अर्जुन धोत्रे (बाभळेश्वर ता. राहता), गोरख बाबुराव शिंदे (येळपणे ता. श्रीगोंदा), मिलिंद लक्ष्मण शिंदे (पिंपरखेड ता. जामखेड), लक्ष्मण मोघा केदार (चिकलठाणा ता. राहुरी), राधाबाई मोहन देशमुख (अकोले), सुभाष त्रिंबक साळवे (शेवगाव), दानिश सलीम तांबोळी (माळीवाडा, अहमदनगर), योगेश जगन्नाथ घोलप, मोहिनी वीरेश पाचपुते (काष्टी ता. श्रीगोंदा), अंबिका मल्हार (पारनेर), शकुंतला अरविंद आहेर आणि विष्णू लक्ष्मण शिंगटे (वाघोली ता. शेवगाव) यांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अहमदनगर जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पैठणीचा फेटा परिधान करून तसेच साईबाबांची मूर्ती, ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. सुत्रसंचालन निवेदीका कल्पना साठे यांनी केले तर आभार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मानले.

शासन आपल्या दारी अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 80 स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री तक्रार कक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारींची दाखल करून घेऊन त्यांना टोकन नंबर देण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागाने घेतलेल्या रोजगार मेळाव्यास तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेतकर्‍याच्या मुलाला आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या सच्च्या कार्यकर्त्याला किती पाण्यात बघाल? तुम्हाला उठता-झोपता फक्त एकनाथ शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री दिसतात. इतिहासात संताजी धनाजी दिसायचे तसे. पण कितीही केलं, तरी एक लक्षात ठेवा. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देवाची नाही; नवर्‍याची कृपा !

यावेळी लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली. तसंच समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल त्यांनी काही सल्ले दिले. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा. कारण जगात आपण एक किंवा दोन नंबरवर पोहोचलो आहोत. लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनलाही मागे टाकलंय, असे अजित पवारांनी सांगितले. अरे बाबांनो, जमीन आहे तेवढीच आहे. मुळा आणि भंडारदरा यापेक्षा धरणं बांधता येत नाही. साईटच शिल्लक नाही..करायचं काय? असा प्रश्न त्यांनी विचारला. देवाची कृपा..देवाची कृपा..कसली देवाची कृपा? नवर्‍याची कृपा असते. आपण जरा व्यवहारी वागलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले. तुम्हाला विनंती आहे. रस्ते चांगले केले ते गाड्या वेगाने पळवण्यासाठी केले नाहीत. पण अनेक वाहनचालक जोराने गाड्या पळवतात. अशाने टायर फुटणे आणि अपघातांचे प्रकार समोर येतात. समृद्धी महामार्ग चांगला प्रकल्प आहे. तो बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या